Join us  

Sunil Dutt Birth Anniversary : नर्गिस यांची मुलाखत घेताना सुनील दत्त यांना फुटला होता घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 11:06 AM

 सिलोन  रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची सुनील दत्त यांची इच्छा होती. ती संधी लवकरच त्यांना मिळाली.  पण ही मुलाखत झालीच नाही.

ठळक मुद्देनर्गिसवर सुनील दत्त यांचे प्रचंड प्रेम होते. सुनील दत्त बाहेर कुठेही गेलेत की, नर्गिस यांच्यासाठी साडी आणायचे. पण सुनील यांनीआणलेली एकही साडी नर्गिस कधी नेसल्या नाहीत.

अभिनेते सुनील दत्त उर्फ बलराज दत्त आज आपल्यात नाहीत. पण एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून ते कायम लोकांच्या मनात जिवंत असतील. आज (६ जून) सुनील दत्त यांचा वाढदिवस आहे.  ६ जून १९२९ रोजी त्याकाळी भारतात असलेल्या पाकिस्तानमधील झेलम   येथे सुनील दत्त यांचा जन्म झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना वयाच्या पाचव्या वर्षी  त्यांच्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. ते अठरा वर्षांचे असताना भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उठलेल्या दंगलीतून याकूब नावाच्या मुस्लिम तरुणाने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले होते.

फाळणीनंतर सुनील दत्त  कुटुंबीयांबरोबर हरियाणाच्या यमुना नगर स्थित मंडोली गावात स्थायिक झाले. त्यानंतरचा काही काळ त्यांनी लखनौमध्ये घालवला. येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांनी काही काळ मुंबईतील ‘बेस्ट’ या लोकल बसमध्ये  नोकरी केली. यादरम्यान  सिलोन रेडिओमध्ये आरजेची नोकरी करत असताना त्यांच्या फिल्मी करिअरलाही सुरुवात झाली.  

 सिलोन  रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची सुनील दत्त यांची इच्छा होती. ती संधी लवकरच त्यांना मिळाली.  पण ही मुलाखत झालीच नाही. याचे कारण म्हणजे, नर्गिस समोर आल्यावर सुनील दत्त एक शब्दही बोलू शकले नाहीत. नर्गिस त्यावेळी यशोशिखरावर होत्या. नर्गिस यांना पाहिले आणि सुनील दत्त यांना काहीही सुचेनासे झाले. त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडेला. अखेर ती मुलाखत रद्द करण्यात आली. यामुळे सुनील दत्त यांची नोकरी जाता जाता वाचली. विशेष म्हणजे, ज्या अभिनेत्रीला पाहून सुनील दत्त यांना घाम फुटला होता, तिच्यासोबत काम करण्याची संधी पुढच्या काही वर्षांत त्यांच्यापुढे चालून आली. इतकेच नाही तर हीच अभिनेत्री पुढे त्यांची पत्नी झाली.  

१९५७ साली  साली सुनील दत्त व नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या सिनेमात एकत्र काम केले. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. याच सिनेमाच्या सेटवर सुनील दत्त यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्यातील लव्हस्टोरी बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.   

नर्गिसवर सुनील दत्त यांचे प्रचंड प्रेम होते. सुनील दत्त बाहेर कुठेही गेलेत की, नर्गिस यांच्यासाठी साडी आणायचे. पण सुनील यांनीआणलेली एकही साडी नर्गिस कधी नेसल्या नाहीत. कारण पतीने आणलेली एकही साडी त्यांना आवडली नाही.

टॅग्स :सुनील दत्तनर्गिस