रेल्वे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 10:54 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला रेल्वे प्रवास त्याला अडचणीत आणू शकतो अशी चिन्हे ...
रेल्वे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला रेल्वे प्रवास त्याला अडचणीत आणू शकतो अशी चिन्हे दिसू लागली आहे. रेल्वे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राजस्थानातील कोटा येथील एका विक्रम सिंगने शाहरुख विरोधात तक्रार केली आहे. यामुळे शाहरुख विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खानने २४ जानेवारीला आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईहून दिल्ली रेल्वे प्रवास केला होता. त्यावेळी ही ट्रेन काही स्टेशन्सवर थांबली होती. येथे शाहरुखने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करीत चाहत्यांचे अभिवादन केले होते. यामध्ये कोटा या रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. कोटा स्थानकावर शाहरुखच्या चाहत्यांमुळे गोंधळ आणि दंगली सारखी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी तक्रार कोटा स्टेशनवरील स्टॉलधारक विक्रम सिंगने केली आहे. एबीपी माझा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार, विक्रम सिंगने आपल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की, शाहरुखने ट्रेनच्या गेटवर उभे राहून चाहत्यांच्या दिशेने काहीतरी भिरकावले. ती वस्तू पकडण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. या गोंधळात आपली ट्रॉली उलटली, विक्रीला ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाले आणि आपण जखमी झाल्याचा दावाही सिंग यांनी तक्रारीत केला आहे. आपल्या ट्रॉलीतील काही रोकडही गदीर्तील माणसांनी चोरल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे. त्यानंतर कोटी जीआरपीने दंगल आणि रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी शाहरुखवर गुन्हा नोंदवला आहे. २४ जानेवारीला पहाटे पाच वाजता शाहरुख कोटा स्थानकावर आला होता. निव्वळ चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता शाहरुखच्या पीआर टीमने हे आयोजन केलं होतं, असं जीआरपी अधीक्षक मेघवाल यांनी म्हटलं आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मेघवाल यांनी सांगितले. ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खानला पाहण्यासाठी बडोद्यातही चाहत्यांची झुंबड उडाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आपल्या बहिणीला सोडण्यास आलेल्या एका स्थानिक नेत्याला आपला जीव गमावावा लागला. फरीद खान यांचा मृत्यू झाला, तर यावेळी दोन पोलिसही जखमी झाले.