भारतीय सैन्यानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं आणि दहशतवादी ठिकाणे उद्धवस्त केली. पण, यामुळे पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानने त्यानंतर रात्री भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने तो हल्ला हाणून पाडला. यानंतर भारताने त्याच रात्री प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, काल अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकमध्ये अर्थात युद्धविरामाची (India Pak Ceasefire) घोषणा झाली. यानंतर भारताची माजी टेनिसपटू आणि पाकिस्तानची EX सून सानिया मिर्झानं पोस्ट शेअर करत देवाचे आभार मानले. पण, त्याआधी सानियानं केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
सानिया मिर्झा हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून युद्ध नव्हे तर शांततेचा संदेश दिला होता. सानियाने लिहिलं होतं, "मुत्सद्देगिरी हा कमकुवतपणा नाही, शांतता ही चैनीची गोष्ट नाही, त्याची निवड करावी. कारण, तोच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. संघर्ष वाढत गेल्यावर काय होतं हे आपण गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत पाहिलं आहे. झेंडे जरी वेगळे असले तरी दु:ख हे मात्र सारखंच दिसतं" या वाक्यांतून तिने युद्धाच्या वेदना कोणत्याही देशात सारख्याच असतात, हे अधोरेखित केलं होतं.
सानिया मिर्झा ही भारताच्या टेनिस विश्वातील मानाचा तुरा आहे. ती भारताच्या सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक आहे. तिने सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवले असून, २०१५ मध्ये जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला होता. सानिया पाकिस्तानच्या क्रिकेटपटू शोएब मलिकची घटस्फोटीत पत्नी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याकडे दोन्ही देशांमध्ये विशेष लक्ष दिलं जातं. सानिया ही मुलासोबत दुबईमध्ये राहते. सानियासोबतच्या घटस्फोटानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले.