२००० या वर्षी दियाने मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब मिळविला. याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.
खरं तर दिया मिर्झाला बी-टाउनमध्ये प्रवेश देण्याचे पूर्ण श्रेय सलमान खान यालाच जाते. ही बाब स्वत: दियानेच एक ट्विट करून सांगितली होती. त्याचबरोबर तिने एक किस्साही ट्विटच्या माध्यमातून सांगितला. तिने लिहिले की, सलमान खाननेच माझ्या आईचे प्राण वाचविले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दियाच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. त्या बेशुद्ध पडल्या होत्या. घाबरलेल्या दियाने लगेचच सलमानला फोन केला. त्यावेळी सलमानचे घर दियाच्या घरापासून काही अंतरावरच होते. तो तब्बल एक किलोमीटर पळत दियाच्या घरी आला अन् तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली.