श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर सलमान खानला अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 10:17 IST
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव काल सायंकाळी ६.३० वाजता दुबईहून जेट विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते आणि ...
श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर सलमान खानला अश्रू झाले अनावर
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव काल सायंकाळी ६.३० वाजता दुबईहून जेट विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते आणि रात्री साडे नऊच्या सुमारास श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आले. त्यानंतर अॅम्ब्युलसने श्रीदेवी यांचे पार्थिव अंधेरी येथील ग्रीन एकर्स येथील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. बोनी कपूर यांच्या घरी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कपूर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी घरी हजेरी लावली होती. मंगळवारी रात्री अभिनेता सलमान खानही श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचला होता. श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले. श्रीदेवींचे पार्थिव पाहून सलमान खान रडायला लागल्याची माहिती मिळते आहे. सलमान खानने चंद्रमुखी या चित्रपटात श्रीदेवी यांच्यासोबत काम केले होते. फक्त सलमान खान नाही तर श्रीदेवींच्या करोड्या चाहत्यांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. भरलेल्या डोळ्यांनी सगळेच जण श्रीदेवी यांना अखेरचा अलविदा करत आहेत. श्रीदेवी यांची शेवटची एक झलक तरी पाहायला मिळावी यासाठी त्यांचे फॅन्स मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित होते.मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.