‘मुंबईची राणी’ मलिष्का म्हणते,‘हीच का तुमची नैतिकता?’ टिवटमधून व्यक्त केला संताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 13:21 IST
‘सोनु, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? ’ या गाण्याने अख्या जगाला वेड लावणारी आरजे मलिष्का अल्पावधीतच एकदम फेमस झाली. ...
‘मुंबईची राणी’ मलिष्का म्हणते,‘हीच का तुमची नैतिकता?’ टिवटमधून व्यक्त केला संताप!
‘सोनु, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? ’ या गाण्याने अख्या जगाला वेड लावणारी आरजे मलिष्का अल्पावधीतच एकदम फेमस झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्याने लोकांचे मनोरंजन तर केले पण, यावेळी हीच आरजे मलिष्का एल्फिन्स्टन येथे नुकत्याच झालेल्या घटनेविषयी संतापून काही प्रश्न विचारत आहे. नुकत्याच मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सर्वच स्तरांतून या दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त करण्यास सुरुवात झालीय. देशाच्या राष्ट्रपतींपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनीच याविषयी ट्विट केले आहे. प्रचंड गर्दी असणाऱ्या या शहरामध्ये येणारी अलोट गर्दी आणि रेल्वे प्रशासनाची हेळसांड यामुळे काही निष्पापांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यांच्या या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण, रेल्वे प्रशासन, राजकीय नेते की सर्वसामान्य जनता असाच प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.सोशल मीडियावरही एल्फिन्स्टन असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला असून, ‘मुंबईची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरजे मलिष्कानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत या दुर्देवी घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘या दुर्घटनेनंतर आधी पूल तुटल्याचं आणि शॉक सर्किटचं कारण देण्यात आलं. त्यानंतर पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं गेलं. हीच का तुमची नैतिकता?, असा प्रश्न मलिष्काने तिच्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. मलिष्काच्या या ट्विटला काही जणांनी रिट्विट केलं आहे. तिचं हे ट्विट पाहता आता ती आणखी काय वक्तव्य करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या दुर्घटनेनंतर अनेकांनीच त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देत या सर्व प्रकाराबद्दल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत मत व्यक्त केलं आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर अनेकांनी रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. प्रत्यक्षदर्शी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावरील दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी ट्रेन आल्याने मोठी गर्दी झाली. याचवेळी पाऊस सुरु असल्याने रेल्वे पुलावर क्षमतेपेक्षा जास्त संख्येने लोक जमा झाले. यानंतर एकच गोंधळ झाला आणि सर्वांनी एकाच वेळी पुलावरुन उतरण्याचा प्रयत्न सुरु केला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला.