Join us
Daily Top 2Weekly Top 5

​महेश भट्ट यांनी केली पुन्हा एक ‘वादग्रस्त’ मागणी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 15:33 IST

पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवरील बंदी मागे घेतली. तशीच भारतानेही पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी मागे घ्यावी, या मागणीने आता तोंड वर काढले ...

पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवरील बंदी मागे घेतली. तशीच भारतानेही पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी मागे घ्यावी, या मागणीने आता तोंड वर काढले आहे. ही मागणी केलीय, महेश भट्ट यांनी.  एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी ही मागणी पुढे रेटली.काही महिन्यांपूर्वी फवाद खान, अली जफर आणि माहिरा खान हे पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडमधून बाद झाले. ऊरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलावंतांना काम करण्यास बंदी असावी, अशी राजकीय मागणी झाली आणि या मागणीने संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले. करण जोहर, महेश भट्ट सारख्या अनेक निर्मात्या-दिग्दर्शकांनी या ‘राजकीय’ मागणीचा विरोध केला. अर्थात कालांतराने या मागणीपुढे त्यांना झुकावेच लागले.भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादली गेली तर तिकडे पाकिस्तानात भारतीय चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली गेली. मात्र काहीच दिवसांत पाकिस्तानला ही बंदी मागे घ्यावी लागली. याचा परिणाम म्हणजे आमिर खानचा लवकरच येऊ घातलेला ‘दंगल’ हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होणार आहे.  या पार्श्वभूमीवर महेश भट्ट यांनी परखड मत मांडले आहे. दहशतवाद हा मुद्दा असला तरी माझ्या मते भारत-पाक दोन्ही देशांनी एकमेकांशी असलेली सांस्कृतिक नाळ तुटू देता कामा नये, असे माझे मत आहे. या मुद्यावर केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा, असे माझे मत आहे. भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्यापासून पाकिस्तानमधील चित्रपटगृह ओस पडू लागली होती. त्यामुळेच भारतीय चित्रपटांवरील बंदी पाकिस्तानला मागे घ्यावी लागली. आपल्याकडे तसे नाही. पण माझ्या मते, आपणही पाकिस्तानी कलावंतांवरील बंदी मागे घ्यायला हवी. कारण शेवटी भारत-पाक दोन्ही देश सांस्कृतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांशी संलग्न आहेत, हे कुणीही नाकारू शकत नाही. अर्थात मी अल्पसंख्याक समाजातील असल्याने माझे हे मत कुणीही फारसे मनावर घेणार नाही. पण दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या दोन्ही देश एकमेकांशी जुळून राहणे गरजेचे आहे, असे महेश भट्ट म्हणाले.