६ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या क्षेपणास्त्र हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागात ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये लष्कर-ए-तोएबाचे मुख्य प्रशिक्षण केंद्रही उडवून देण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत घोषणेनंतर सिने जगतातही त्याचे पडसाद उमटले. ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना अनेक बॉलिवूड स्टार्सनी भारतीय सैन्याचे कौतुक करत आहेत.
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)ने रात्री ३ वाजून २ मिनिटांनी X (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट शेअर करत ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. रितेशची ही पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, जय हिंद की सेना... भारत माता की जय... ऑपरेशन सिंदूर.
रितेश देशमुखसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री देओलिना भट्टाजार्चीने लिहिले की, धर्माबद्दल विचारल्यानंतर तुम्ही गोळीबार केला, आता तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. तुम्ही भारताच्या आत्म्यावर हल्ला केला, आता तुम्ही मातीत मिसळून जाल. जय हिंद. जय भारत. जय हिंद की सेना.
निर्माते-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही X अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आम्ही एकत्र उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम.
ऑपरेशन सिंदूरपहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने ६ मे रोजी रात्री संयुक्त मोहीम राबवली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने पहाटे १:४४ वाजता प्रसिद्ध केलेल्या निवेदनात 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत लष्करी हल्ले करण्यात आल्याची पुष्टी केली.