हँडसम हिरो ही संकल्पना कालबाह्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 17:50 IST
श्याम बेनेगल यांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. एका वहिनीवर होणाऱ्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे तीन सिनेमे दाखवले ...
हँडसम हिरो ही संकल्पना कालबाह्य
श्याम बेनेगल यांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. एका वहिनीवर होणाऱ्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे तीन सिनेमे दाखवले जाणार आहेत. या निमित्ताने पॅरलल सिनेमा, आजचा सिनेमा यांवर श्याम बेनेगल यांनी आपली मते मांडली.आर्ट फिल्म, पॅरलल सिनेमा असा सिनेमांमध्ये जो भेदभाव केला जातो हे मला पटतच नाही असे श्याम बेनेगल सांगतात. सिनेमा हा केवळ चांगला अथवा वाईट असू शकतो, त्याशिवाय सिनमाचे प्रकार असूच शकत नाहीत. कोणताही सिनेमा हा त्याच्या कथेमुळे, त्यात असलेले कलाकार यांमुळे हिट होतो. सिनेमाची नाळ प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली तर त्यांना सिनेमा आवडणारच याच काही शंका नाही. त्यामुळे सिनेमाचे वेगवेगळे प्रकार केले जाऊ नयेत असे स्पष्ट मत श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले. झी क्लासिकच्या इंडियाज फायनेस्ट फिल्मस या फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्याम बेनेगल यांचे सुरज का सातवा घोडा, मम्मो, गांधी से महात्मा तक हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी से महात्मा तक या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी घडलेली एक घटना ते कधीच विसरू शकत नाहीत असे ते सांगतात. या चित्रपटात महात्मा गांधी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेत राहात होते, त्यावेळेचा काळ दाखवायचा होता. यासाठी अनेक भारतीयांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेत भारतीय खूप कमी असल्याने चित्रीकरणासाठी भारतीय कुठून आणायचे हा त्यांना प्रश्न पडलेला होता. त्यामुळे त्यांनी जाहिरात दिली. या जाहिरातीला उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला हव्या असलेल्या संख्येपेक्षा कित्येक पट अधिक लोक जमा झाले. तसेच या चित्रपटात रज्जत कपूर गांधीजीची भूमिका साकारत होते. या भूमिकेचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता की ते शाकाहारी झाले होते. तसेच गांधीजीप्रमाणे स्वतःची कामे ते स्वतः करायला लागले होते.श्याम बेनेगल यांना आजच्या पिढीतील अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांचे चित्रपट खूप आवडतात. त्यांच्यामते त्या दोघांचेही चित्रपट अतिशय चांगले असून ते मनाला भिडतात. त्या दोघांचे चित्रपटनिर्मितीचे कौशल्य त्यांना खूप आवडते. आधीच्या पिढीपेक्षा आजची पिढी ही जास्त हुशार, विचार करणारी आहे आणि याचा त्यांना खूप फायदा होतो असे ते सांगतात. आजचे वातावरण खूप बदललेले आहे. आजच्या प्रगत मीडियामुळे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. तसेच आजच्या पिढीला खूप चांगल्या संधी मिळत आहेत असे ते सांगतात. तांत्रिकदृष्ट्या आजचा सिनेमा प्रचंड प्रगतही झालेला आहे असेदेखील त्यांचे म्हणणे आहे.आजच्या सिनेमातली बेनेगल यांनी आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हिरो हा हँडसमच असला पाहिजे असा पूर्वी बॉलिवुडमध्ये समज होते. पण आज ती गोष्ट कालबाह्य झालेली आहे. पूर्वी हिरो हँडसम असल्याशिवाय, अथवा गोरा असल्याशिवाय त्याचा स्वीकार प्रेक्षक करत नसत. अभिनयक्षमता असली तरी अशा कलाकारांना दुय्यम भूमिका साकाराव्या लागत असत. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि याचा मला प्रचंड आनंद होत आहे असे ते सांगतात. लोक दिसण्यापेक्षा अभिनयाला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आपल्या बॉलिवुडमध्ये घडत आहे. याचमुळे इरफान खान, नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळालेली आहे आणि या संधीचे त्यांनी सोनेदेखील केलेले आहे. आज इरफानने केवळ भारतातच नव्हे तर हॉलिवुडमध्येही आपले नाव कमावले आहे. आपला भारतीय सिनेमा खूपच बदलत आहे.आज भारतीय सिनेमाप्रमाणेच प्रेक्षकही खूप बदलले आहेत. प्रेक्षक खूप सजग झालेले आहेत. ते नवनवीन गोष्टींचा स्वीकार करायला लागले आहे. याचा आपल्या सिनेमांनाच फायदा होणार असल्याचे श्याम बेनेगल सांगतात.