Join us  

'नायक' अनिल कपूर म्हणतो, देवेंद्र अन् आदित्य हे महाराष्ट्राचे 'नायक'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:54 PM

नायक या चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता या दोन राजकारण्यांचे नाव घेतले.

ठळक मुद्देअनिल कपूरने क्षणाचाही विलंब न लावता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले. 

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर देखील लोक आपल्या आवडत्या पक्षाचा, उमेदवाराचा प्रचार करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक मंडळीदेखील सोशल मीडियाद्वारे आपल्या आवडत्या पक्षाला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच अनेक कलाकार भरभरून आपल्या आवडत्या पक्षाबाबत आणि उमेदवाराबाबत बोलताना दिसत आहेत.

बॉलिवूडचा नायक अनिल कपूर नुकताच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये असताना त्याने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. त्याने त्याच्या चित्रपटाविषयी, एकंदर बॉलिवूड प्रवासाविषयी उपस्थित पत्रकारांसोबत मनमुराद गप्पा मारल्या. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असल्याने अनिलला बॉलिवूडसोबतच राजकारणाविषयी देखील विचारण्यात आले. अनिल कपूरने नायक या चित्रपटात एका मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. एका वाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला म्हणजेच अनिलला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळते आणि केवळ एका दिवसांत तो राज्यात किती बदल घडवतो हे प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाले होते. याच चित्रपटाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा नायक कोण असे अनिल कपूरला विचारण्यात आले होते. अनिल कपूरने क्षणाचाही विलंब न लावता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे नायक असल्याचे कबूल केले.

अनिल पुढे म्हणाला की, बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच माझे ठाकरे कुटुंबियांसोबत खूप चांगले संबंध आहेत. तसेच माझे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील खूपच चांगले नाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोघेही तडफदार आणि अभ्यासू असून ते दोघे महाराष्ट्रासाठी खूप चांगले काम करतील याचा मला विश्वास आहे

 

टॅग्स :अनिल कपूरदेवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019