बिझनेसमन संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं काल लंडनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते फक्त ५३ वर्षांचे होते. करिष्मा कपूरचे ते ex पती होते. आता संजय कपूर यांचं निधनापूर्वीचं ट्वीट व्हायरल होत आहे. काल झालेल्या अहमदाबाद एअर इंडिया विमानाच्या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेल्यांना त्यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती. या ट्वीटनंतर काही तासातच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसंच त्यांचं ६ दिवसांपूर्वीचंही एक ट्वीट व्हायरल होत आहे.
संजय कपूर इंग्लंडच्या गार्ड्स पोलो क्लबमध्ये होते. पोलो खेळतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि ते खाली पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. निधनाच्या काही तास आधीच त्यांनी ट्वीट केलं होतं. एअर इंडिया विमान दुर्घटनेत अनेक लोकांचा जीव गेला यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. संजय कपूर यांनीही ट्वीट करत लिहिले होते की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेमुळे बाधित सर्व कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना कायम आहेत. देव त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं शक्ती देवो."
इतकंच नाही तर ३ दिवसांपूर्वीच आणखी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी मंडे मोटिव्हेशन पोस्ट शेअर केली होती. ज्यात म्हटलं होतं की, "तुमची पृथ्वीवर राहण्याची वेळ ही मर्यादित आहे. त्यामुळे(व्हॉट इफ) काय होऊ शकतं ते तत्वज्ञानावर सोडा आणि का नाही (व्हाय नॉट) वर लक्ष केंद्रित करा."
त्यांची ही दोन ट्वीट पाहून अनेकांना आश्चर्यच वाटलं आहे. आयुष्य किती अनिश्चित आहे, कधी काय होईल सांगता येत नाही असंच अनेकांच्या मनात आलं आहे.
संजय कपूर यांनी २००३ साली अभिनेत्री करिष्मा कपूरशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही झाला. मात्र लग्नानंतर १३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. करिष्माने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. करिष्माशी घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी दुसरं लग्न केलं.