Join us

​बोनी कपूर परतणार नाहीत भारतात, चौकशीसाठी त्यांना काही काळ थांबावे लागणार दुबईत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:30 IST

श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे ...

श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल.श्रीदेवी यांचे कुटुंबिय त्यांचे पार्थिव घेऊन मुंबईत येणार असले तरी बोनी कपूर यांना काही काळ दुबईतच राहावे लागणार असल्याचे टाईम्स नाऊने म्हटले आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवी यांच्या मृत्यूची अद्याप चौकशी सुरू असल्याने काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बोनी कपूर यांना काही काळ दुबईत थांबावे लागणार आहे. श्रीदेवी यांचा हृद्यविकाराने मृत्यू झाला असल्याची चर्चा शनिवारपासून होती. पण आता त्यांच्या मृत्यूप्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे. आता श्रीदेवी यांच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. तसेच श्रीदेवी यांचे जुने मेडिकल रिपोर्ट देखील भारतातून मागवण्यात आले आहेत. श्रीदेवी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते का याविषयी देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच त्यांनी केलेल्या सर्जरीचे देखील रिपोर्ट मागण्यात आले आहेत. या सगळ्याचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याची तपासणी देखील पोलिस करणार आहेत. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. Also Read : वडिलांना आधार द्यायला अर्जुन कपूर दुबईला रवाना