काही नावे काळाच्या पटलावर कायमची कोरली जातात. त्यांची महती कधीच कमी होत नाही. आपल्या स्वरामृताने रसिक-प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या गीता दत्त यांचे नाव याच श्रेणीतील आहे.
‘बंगाल का जादू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीता दत्त यांचा आज जन्मदिन. वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी अनाहुत चालून आलेल्या संधीमुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे आगमन झाले. ‘याद करोगे, याद करोगे, एक दिन हमको याद करोगे’ असे मेहदी अली खान यांचे शब्द गात असताना कदाचित त्यांनी कल्पना केली नसेल की, आज ६९ वर्षांनंतरही हे शब्द त्यांच्या जीवनाची हकीकत बनून राहतील.फरीदपूर (आता बांग्लादेशमध्ये) येथे २३ नोव्हेंबर, १९३० रोजी एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना नऊ भावंडे होती. त्या बारा वर्षांच्या असताना त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. येथे के. हनुमान प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संगीतप्रवास सुरू झाला. ते स्वत: संगीत दिग्दर्शक असलेला पौराणिक चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’मध्ये (१९४६ ) दोन ओळी गाण्याची छोट्या गीताला संधी मिळाली.त्यानंतर पुढील वर्षी ‘दो भाई’ (१९४७) चित्रपटातील सुपरहीट गाण्यांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ या गाण्याने तर श्रोत्यांच्या मनावर गारुड निर्माण केले. बंगाली भाषेचा लहेजा असूनही त्यांच्या आवाजातील तजेलदारपणा, मंजुळ स्वर आणि उत्साह व करुणरस यांच्या एकत्रित मिश्रणाने संपूर्ण देशातील संगीतप्रेमींच्या त्या गळ्यातील ताईत बनल्या.
ट्रॅजेडी कपल : मुलासमवेत गीता दत्त आणि गुरु दत्तलोकप्रियतेच्या बाबतीत शमशाद बेगम आणि राज कुमारी यांना मागे सारत गीता दत्त हिंदी चित्रपटसृष्टीतील क्रमांक एकच्या गायिका बनल्या. लता मंगेशकर नावाचे वादळ दाखल झाल्यावरही त्यांनी आपले स्थान डळमळू दिले नाही.पन्नासचे दशक म्हणजे त्यांच्या करिअरमधील सुवर्ण काळ. महान संगीतकार एस. डी. बर्मन, खय्याम, मदन मोहन, ओ. पी. नय्यर, हेमंत कुमार, हंसराज बेहल, वसंत देसाई, चित्रगुप्त, गुलाम मोहम्मद अशा दिग्गजांनी बनवलेल्या चालींना त्यांच्या मधुर स्वरांनी अजरामर केले.त्यांच्या गायनशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आवाजातील वैविध्यता. एकीकडे ‘बाबूजी धीरे चलना’सारखे कॅब्रेमध्ये चित्रित होणारे गाणे गात तर दुसरीकडे ‘जय जगदीश हरे’सारखे भक्तीरसात तल्लीन होऊन भजनही त्या गात असे. गायनातील हेच अष्टपैलुत्व त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते.अशा या महान गायिकेच्या जन्मदिनानिमित्त ऐकूया त्यांची काही अवीट गाणी.
१. तदबीर से बिगडी हुई (बाझी, १९५१) गुरू दत्त दिग्दर्शित ‘बाझी’ चित्रपटात एस. डी. बर्मन यांनी तयार केलेल्या आठ पैकी सहा गाणी गीता यांनी गायिली. तीसुद्धा सोलो. देव आनंद आणि गीता बालीवर चित्रित ‘तदबीर से बिगडी हुई’ या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले होते. याच चित्रपटादरम्यान त्यांचे गुरू दत्तशी प्रेम जुळले आणि १९५३ मध्ये दोघांनी लग्न केले.
२. जा जा जा जा बेवफा (आर पार, १९४५) संगीतकार ओ. पी. नय्यर यांना सुरुवातीला आलेल्या अपयशामुळे निराश होऊन ते हिंदी चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकण्याचा विचार करत होते. गीताने स्वत: पुढाकार घेऊन पती गुरू दत्त यांना गळ घालून ‘आर पार’ सिनेमाच्या संगीतासाठी नय्यर यांची निवड केली. चित्रपट आणि संगीत दोन्ही यशस्वी ठरले. त्यातील ‘जा जा जा जा बेवफा’ हे गाणे तर तुफान लोकप्रिय झाले.
३. जाता कहा है दीवाने (सी. आय. डी., १९५६) हे गाणे आजही लोकांना माहित आहे. पण एक रंजक गोष्ट म्हणजे हे गाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून वगळले होते. त्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. गीता दत्त यांच्या स्वरसाजाने नटलेले हे गाणे बॉलीवूडमधील आयकॉनिक गाणे मानले जाते. अलिकडे अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेल्वेटमध्ये हे गाणे वापरण्यात आले आहे.
४. नन्ही कली सोने चली (सुजाता, १९५९) एस. डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये पडलेल्या फुटीमुळे अनेक गाणी, जी लतादीदींना मिळाली असती, त्यांनी ती गीता दत्त आणि आशा भोसलेंकडून गाऊन घेतली. असेच एक गाणे म्हणजे ‘सुजाता’ चित्रपटातील ‘नन्ही कली सोने चली’ हे अंगाईगीत . ते ऐकले असता गीताव्यतिरिक्त दुसरे कोणीच हे गाणे गाऊ शकले नसते असे वाटते.
५. ना जाओ सैयां, छुडा के बैयां (साहिब, बीवी और गुलाम, १९६२) ‘कागज के फूल’च्या (१९५९) अपयशामुळे गुरू दत्त निराशेच्या गर्तेत हरवून गेले. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरदेखील झाला. त्यांनी गीता यांना केवळ स्वत:च्याच चित्रपटात गाण्याची सक्ती केली. तसेच गुरूचे वहिदा रेहमानसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे गीता खूप हताश झाल्या होत्या. काही अंशी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारित ‘साहिब, बीवी और गुलाम’ चित्रपटातील हे गाण्यामध्ये त्यांनी जीव ओतलेला आहे.