Join us

दुबळ्या ‘तमाशा’ला अभिनयातून सावरण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 28, 2015 00:33 IST

‘सोचा न था’, ‘जब वी मेट’ आणि ‘लव्ह आजकल’ या चित्रपटांपर्यंत इम्तियाज अली यांनी कथेला असे स्वाभाविक रूप दिले होते की प्रेक्षक त्यात गुंतत गेले.

‘सोचा न था’, ‘जब वी मेट’ आणि ‘लव्ह आजकल’ या चित्रपटांपर्यंत इम्तियाज अली यांनी कथेला असे स्वाभाविक रूप दिले होते की प्रेक्षक त्यात गुंतत गेले. आधी ‘रॉक स्टार’ आणि ‘हायवे’मध्ये अलींनी कथेवर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि ‘तमाशा’मध्ये त्यांनी असा काही प्रयोग केला की क्वचितच तो प्रेक्षकांच्या पचनी पडेल.वेद (रणबीर कपूर) आणि तारा (दीपिका पदुकोण) यांची ही कथा आहे. या दोघांची भेट फ्रान्समधील एका शहरात होते. ते मग दोघे एकमेकांच्या जवळही येतात, पण त्याचवेळी यानंतर पुन्हा भेटायचे नाही असेही ठरवतात. दोघेही आपापल्या मार्गांनी भारतात येऊन आपल्या दैनंदिन व्यवहारांत हरवून जातात. फ्लॅशबॅकने हे समजते की सिमल्याचा रहिवासी असलेल्या वेदला लहानपणापासूनच चित्रपटांच्या कथांचा नाद होता, पण त्याचे वडील त्याला गणित शिक म्हणून आग्रह करीत होते. लहानपणापासूनच आपल्या मनासारखे जगणारा वेद शेवटी वडिलांच्या इच्छेप्रमाणे मोठे शिक्षण घेऊन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला लागतो. अनेक वर्षांनंतर वेद आणि ताराची भेट होते. वेद अतिशय सामान्य जीवन जगताना बघून ताराला त्याने आपल्या इच्छा-आकांक्षांना मारून टाकल्याची जाणीव होते. ती वेदला बदलू बघते. परंतु तो गोंधळून जातो व तिच्या भावना त्याला समजत नाहीत. एके दिवशी तो धाडस करून वडिलांना मला आयुष्यात काय हवे आणि तो कसे जीवन जगू इच्छितो ते सांगतो. वडिलांनाही आपल्या मुलाच्या भावना समजतात व चित्रपटाच्या ज्या जगात त्याला आनंद मिळत असतो तेथे तो दाखल होतो. शिवाय ताराचीही त्याला कायमस्वरूपी सोबत होते.उणिवा : इम्तियाज अलींनी कथेवर गरजेपेक्षा जास्त प्रयोग केले. प्रेमकथा असली तरी चित्रपटात सहजपणाचा अभाव आहे. चित्रपटाची सुरुवात योग्य पद्धतीने होते, परंतु ती नंतर फ्लॅशबॅकमध्ये प्रवेश करून विस्कळीत होते व नंतर कधीच रुळावर येत नाही. या चित्रपटाचे लेखन एवढे कमकुवत आहे की त्यामुळे प्रेक्षक वेद आणि तारा या पात्रांशी जोडलेच जाऊ शकत नाहीत. वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष यापूर्वी अनेक चित्रपटांत येऊन गेला आहे. इम्तियाज अली हा संघर्ष काही ‘तमाशा’मध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवू शकले नाहीत. दुसरा दोष म्हणजे ही प्रेमकथा असूनही ती तशी जाणवत नाही. कारण त्यात ना रोमान्स ना संवेदना. वेद हे पात्र खूपच गोंधळ निर्माण करते तर ताराच्या भूमिकेत ताजेपणाच नाही. मुख्य भूमिकाच जेव्हा गोंधळलेल्या असतात तेव्हा अशा चित्रपटाचे काय होणार हे वेगळे सांगायची गरज नाही.‘तमाशा’तील गाण्यांत काहीही दम नाही. ए. आर. रहमानचे संगीतदेखील या चित्रपटाची दुबळी बाजू आहे. चित्रपटाचे संपादनही कमकुवत आहे. चित्रपटाचा किमान अर्धा तास कमी करता आला असता एवढे संपादन होऊ शकले असते. दिग्दर्शक या नात्याने इम्तियाज ‘तमाशा’त अपयशी ठरले आहेत.वैशिष्ट्ये : रणबीर-दीपिकाची जोडी पडद्यावर छान दिसते. विशेषत: फ्रान्समधील त्यांची मौजमजा चित्रपटाचा चांगला भाग आहे. रणबीर कपूरने आपल्या दुबळ्या भूमिकेला अभिनयातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. भावनात्मक दृश्यांत दीपिकाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या दोघांच्या कामगिरीशिवाय फ्रान्स आणि जपानमधील स्थळे आकर्षक आहेत.का पाहावा ? फक्त रणबीर आणि दीपिकाच्या जोडीसाठी.का पाहू नये?खूपच दुबळी कथा. एकूण काय तर ‘तमाशा’ सर्वसामान्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे.