ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. ७ - विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना ब-याच टीकेला सामोरे जावे लागले होते. हे प्रकरण खूप तापल्यावरही त्यांनी या विषयावर मौन बाळगले. मात्र आता हे दोघेही आता धार्मिक बनले असून लौकरच ते 'चार धाम यात्रे'चे प्रमोशन करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे. उत्तराखंड सरकारने त्या दोघांनाही या यात्रेचे 'ब्रँड अँबॅसेडर' म्हणून नेमण्याचे ठरवले आहे.
दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात संपूर्ण राज्य उध्वस्त झाले होते, हजारो नागरिकांनी प्रलयात जीव गमावला तर लाखो नागरिक बेघर झाले होते. पुरामुळे राज्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या प्रसिद्ध 'चार धाम यात्रे'लाही त्याचा फटका बसला. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली ही यात्रा पुन्हा सुरू होणार असून 'विराट- अनुष्का' ही प्रसिद्ध जोडी यात्रेचे प्रमोशन करताना दिसणार आहे.
सरकारशी त्यासंबंधी करार करण्यासाठी हे दोघेही मंगळवारी शहरात दाखल झाले. त्यानंतर ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
विश्वचषकातील पराभवानंतर सोशल मीडियावरून अनुष्का- विराटवर टीकेची झोड उठली होती. सेमीफायनलमध्ये विराट अवघी एक धाव काढून बाद झाल्याबद्दलही अनुष्कालाचा जबाबदार धरत तिला पनवती ठरवण्यात आले होते.