संतपटांमध्ये तर वारी पाहायला मिळतेच; पण त्याचबरोबर अनेक सामाजिक चित्रपटांत वारी आणि पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घडते. वारीच्या १८ दिवसांचे संपूर्ण चित्रीकरण ‘गजर’ चित्रपटात करण्यात आले होते. दिग्दर्शक अजित भैरवकर यांच्या तब्बल ११५ जणांनी २४० किलोमीटरचा प्रवास वारीदरम्यान केला. रितेश देशमुख याच्या अभिनयाने गाजलेल्या ‘लय भारी’ चित्रपटाच्या कथेला ‘वारी’ची पार्श्वभूमी आहे. गावातील देशमुखांची पत्नी मूल होत नसल्याने पायी वारी करून विठ्ठलाला नवस बोलते. पहिला मुलगा विठ्ठलाला वाहीन, असा नवस असतो. जुळी मुले झाल्यावर त्यातील एक खरोखरच विठ्ठलाला अर्पण केले जाते. त्यानंतर कौटुंबिक वादातून एका मुलाचा खून झाल्यावर आई दुसऱ्याला पुन्हा घरी आणते. यातील वारीच्या पार्श्वभूमीवरील गाणे खूपच लोकप्रिय झाले. अनेक पुरस्कारविजेत्या ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये पंढरपूर शहराचे मनोहारी दर्शन घडते. आईने शिलाई मशीनसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी चिमुरडी वारीमध्ये वस्तू विकतात. त्यातून वारीमागील अर्थकारणही मांडण्याचा प्रयत्न दिगदर्शकाने केला आहे. ‘धरीला पंढरीचा चोर’ हे अवीट गाणे असणाऱ्या ‘पंढरीची वारी’ चित्रपटात तर प्रत्यक्ष विठ्ठलच लहान बालकाचे रूप घेऊन वारीमध्ये सेवा करतो. रंजना आणि अशोक सराफ हे कलाकारदेखील या चित्रपटात आहेत. तुकारामांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ आणि आत्ताचा लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलेल्या ‘लय भारी’मधून देहू ते पंढरपूरपर्यंतच्या वारीचे दर्शन घडते.
पंढरीच्या वारीचा चित्रपटांतही गजर
By admin | Updated: July 10, 2015 22:15 IST