मनोज गडनीस, मुंबई
गेल्या आर्थिक वर्षाच्या व्यवहारांचे प्राप्तिकर विवरण ज्यांनी भरले आहे, आणि त्याद्वारे ज्यांना परतावा अपेक्षित आहे त्यांना यंदा ते पैसे परत मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थात, ही प्रतीक्षा किती? तर तूर्तास तरी याचे उत्तर नाही! याचे कारण म्हणजे, ज्या करदात्यांच्या प्राप्तिकर विवरणात प्राप्तिकर विभागाने काही त्रुटी शोधल्या आहेत आणि त्याकरिता ज्यांना नोटिसा धाडलेल्या आहेत, अशा लोकांना परतावा देय असला तरी त्या करदात्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते पैसे परत न देण्याचा निर्णय विभागाने घेतला
आहे.
गेल्या दोन आर्थिक वर्षातील कर संकलन घटल्याच्या पार्श्वभूमीवर कर विभागाने आक्रमकपणे मोहीम राबविण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत देशभरातील सुमारे ४० लाख करदात्यांना त्यांच्या प्राप्तिकर विवरणात त्रुटी असल्याच्या नोटिसा धाडल्या. ज्यांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, त्यांना परताव्याची रक्कम देय असली तर ती चौकशीअंती देण्याचा निर्णय घेतला आहे.