लंडन : जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा ‘महामंदी’च्या विळख्यात अडकण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत व उदयोन्मुख बाजारपेठेपुरतीच ही समस्या मर्यादित नाही, तर ही जागतिक समस्या आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी तोडगा काढण्यासाठी नियमांची नव्याने व्याख्या करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लंडन स्कूल आॅफ बिझनेस येथे आयोजित परिषदेत ते बोलत होते. २००८ मधील जागतिक मंदीचे भाकीत करणाऱ्यापैकी राजन हे एक आहेत. ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञही आहेत. ते म्हणाले की, १९३० मधील महामंदीसारखा धोका बळावतोय. जगभरातील केंद्रीय बँकांनी पतधोरणाबाबत नरमाईचे धोरण बाळगू नये, असा इशारा देणाऱ्या राजन यांनी भारतातील स्थिती वेगळी असल्याचे स्पष्ट केले. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदर कमी करण्यावर भर द्यावा लागेल.
जगभरातील केंद्रीय बँकांनी महामंदीचा संभाव्य धोका परतवून लावण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी नियमांबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. जागतिक नियम काय असावेत आणि केंद्रीय बँकेच्या दृष्टीने काय स्वीकारार्ह आहे, यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. १९३० मधील ‘महामंदी’च्या संकटाच्या दिशेने आपण जात आहोत, हीच चिंता सतावत आहे. जागतिक समस्या समजूनच त्यावर मात करण्यासाठी सर्वसंमतीने आणि विचारपूर्वक कार्यवाही करण्याची गरज आहे, असे राजन यांनी स्पष्ट केले. शक्य होईल तोवर मी बाजाराच्या अपेक्षेनुसार व्याजदरात कपात करण्याचे टाळले. भारताची स्थिती आजही अशी आहे की, गुंतवणुकीला चालना देणे भाग आहे. ती कशी देता येईल, याचीच मला चिंता आहे.
जगाला महामंदीचा धोका
जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा ‘महामंदी’च्या विळख्यात अडकण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
By admin | Updated: June 27, 2015 00:19 IST2015-06-27T00:19:06+5:302015-06-27T00:19:06+5:30
जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा ‘महामंदी’च्या विळख्यात अडकण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
