आॅनलाइन- लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह
- दिनकर रायकर
पाऊलवाटेपर्यंत पोहोचण्यासाठी मानवी संस्कृतीला जितका वेळ लागला, त्याच्या तुलनेत नगण्य वेळ राजपथापर्यंत पोहोचण्यास लागला. विकासाच्या वेगाचं हे विलक्षण गणित अनेकदा आणि अनेक बाबतीत सिद्ध झालं आहे. अगदी दहा हजार वर्षे मागे जाऊन मागोवा घेतला तर पूर्वजांनी चिखलात मळवलेली पायवाट सापडते. अशा पायवाटा पगडंडी म्हणून ओळखल्या जात. कालांतराने मौर्यकालीन राजवटीत म्हणजे चौथ्या शतकात राजपथ बांधला गेला. ही वाटचाल उत्क्रांतीवादाच्या वेगाने चालू होती. पण मोटारीचा जन्म झाल्यानंतर, विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर रस्ते वाहतुकीच्या बाबतीत अक्षरश: क्रांती झाली. आजमितीस दिसणारे रस्त्यांचे जाळे आणि त्याच्या विकासाबाबत पाहिली जाणारी स्वप्ने हे त्याच क्रांतीचे फलित आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘ड्रीम व्हिजन’चे निवडक पत्रकारांपुढे सादरीकरण केले. त्याचा एक पैलू होता, रस्ते विकासाचा. या सादरीकरणानंतर मन लंबकासारखे मागे-पुढे झुलत राहिले. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यांच्या बाबतीतला दीर्घ इतिहास आठवला. त्याचवेळी भविष्यातील गुलाबी स्वप्नही डोळ्यांपुढे तरळले.
जर कोणी नेते भविष्यकालीन गरजांचा इतका गंभीर विचार करीत असतील, तर सर्वसामान्यांनी निराशेचा सूर लावण्याचं कारण नाही. मी स्वत: पत्रकारितेच्या निमित्तानं या क्षेत्रातील जे वास्तव काही दशके पाहिलं, ते अशी स्वप्नं पाहण्यासाठी पोषक नव्हतं. महाराष्ट्रासारख्या तुलनेनं प्रगत राज्यात रस्त्यांची स्थिती अभिमानास्पद वगैरे नव्हती. पण रस्ते विकासाचा विषय महत्वाकांक्षी आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या मेगा हायवेचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांच्या जातकुळीतलं आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी यांच्यातील अंतर वेळेच्या परिभाषेत कमी करण्याचा हा प्रकल्प आजमितीस अविश्वसनीय वाटू शकतो. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सभांमधून मुंबई-पुणे अंतर दोन तासांत कापणाऱ्या रस्त्याची भाषा करायचे तेव्हा त्यांची थट्टा केली गेली. पण युतीची सत्ता आल्यानंतर गडकरींनी ते स्वप्न सत्यात आणलं. नेमकं तेच नागपूर-कल्याण अवघ्या सहा तासांत असं सांगणाऱ्या प्रकल्पाचंही होऊ शकतं. २०१९ पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारनं तब्बल ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. चांगले रस्ते त्या परिसराचे आर्थिक गणित सुधारू शकतात. सगळे अर्थकारण चांगल्या अर्थाने बदलू शकतात. याचा साक्षात्कार राजकीय नेतृत्वाला झाला नव्हता, तो काळ मी पाहिला आहे. किंबहुना या बाबतीत राजकीय संवेदनशीलता जागी होत गेल्याच्या संक्रमणावस्थेचा मी साक्षीदार आहे. मुंबई-पुणे दरम्यान खंडाळ््याच्या बोरघाटात पाच तासांपासून १०-१२ तासांपर्यंत चक्का जाम होत असे. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना ती कोंडी फुटली. पण त्यासाठी जयंतराव टिळक आणि श्रीमती अंतुले यांची गाडी त्या घाटात अडकावी लागली. अर्थात त्याच्याही अगोदर कोकणात सागरी महामार्ग उभारण्याचे स्वप्न अंतुले यांनीच पाहिलं आणि महाराष्ट्राला दाखविलं होतं. त्याची किंमत आजमितीस कळते आहे.
स्वप्नाची समाप्ती होण्याच्या अगोदर ते साकार करायला हवं, याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीसांनी या सादरीकरणातून दाखविली. पगडंडी ते राजपथ या वाटचालीतला हा मोलाचा टप्पा आहे. म्हणूनच मला त्याक्षणी गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मंत्रालयातील त्यांच्या दालनात लावलेली पाटी आठवली... ' Roads in America are good, not because America is rich.. In fact, America is rich because, roads in America are good.'
या पाटीचा अन्वयार्थ उभ्या महाराष्ट्राने समजून घेतला की पगडंडी ते राजपथ ही बिकट वाट न राहता वहिवाट बनून जाईल. त्या दिवसाची मला प्रतीक्षा आहे.
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)