मुंबई : शेअर बाजाराने २०१४ वर्षाला आनंदाने निरोप दिला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९६ अंकांनी वधारत २७,४९९.४२ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३४ अंकांनी झेपावत ८,२८२.७० वर गेला. २०१४ मध्ये बीएसई आणि निफ्टीने पाच वर्षातील सर्वाधिक वार्षिक उच्चांक गाठला आहे.
आर्थिक सुधारणांबाबत नव्या सरकारने केलेला वायदा, विदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि आर्थिक वृद्धीच्या शक्यतेमुळे २०१४ मध्ये शेअर्सचे मूल्य वधारले. परिणामी गुंतवणूकदार २८ लाख कोटी रुपयांनी मालदार झाले.
मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच जोरदार झाली. दिवसअखेर निर्देशांक ९५.८८ अंकांनी वधारत २७,४९९.४२ वर पोहोचला. सलग चार दिवस मुंबई शेअर बाजारात तेजी तळपली. या चार दिवसांत सेन्सेक्स२९०.८१ अंकांनी वधारला. १२ पैकी ११ क्षेत्रांचे निर्देशांक फायद्यात राहिले.
वीज, स्थावर मालमत्ता, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू, औषधी, तेल आणि गॅस कंपनीचे शेअर्स नफ्यात राहिले.
गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतीय शेअर बाजाराकडे चांगला पर्याय म्हणून पाहिले जात असल्याने व्याजदर आधारित किंवा गुंतवणूक आधारित शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी सढळ हाताने गुंतवणूक केली. प्राथमिक आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी २७७.९२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, असे कोटक सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव यांनी सांंगितले.
बीएसई निर्देशांकांतील ३० पैकी २२ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात राहिले. यात भेल, डॉ. रेड्डीज लॅब, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदाल्को, भारती एअरटेल आणि टीसीएसचा समावेश आहे. तथापि, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज आॅटो, मारुती सुझुकीचे शेअर्स घसरले.
यावर्षी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सार्वकालिक उच्चांक गाठत २८,८२२.३७ चा पल्लाही गाठला.
विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षात जवळपास १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (निफ्टी) ३४.४५ अंकांनी झेपावत ८,२८२.७० वर पोहोचला.
या वर्षी निफ्टी १,९७८.७० अंकांनी वधारला. २००९ नंतरचा हा सर्वाधिक वार्षिक उच्चांक होय.