मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारांनी पुन्हा एकदा गटांगळी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४ अंकांनी घसरून २७,८११.८४ अंकांवर बंद झाला. बँकांची भांडवलाची स्थिती आणखी काही महिने वाईट राहील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, त्याचा परिणाम बाजारावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी नकारात्मकतेने सुरू झाला. २६,८८0.७२ अंकांवर उघडलेला सेन्सेक्स विक्रीच्या माऱ्यामुळे आणखी खाली घसरला. सत्राच्या अखेरीस ८४.१३ अंकांची अथवा 0.३0 टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,८११.८४ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६.९0 अंकांच्या अथवा 0.२0 टक्क्यांच्या घसरणीसह ८,३८१.१0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,४0८.५५ आणि ८,३३९.७0 अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला.
जागतिक पातळीवर घसरणीचा कल दिसून आला. चीनचा शांघाय कंपोजिट ७.४ टक्क्यांनी घसरला आहे. जपान, हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार 0.१५ टक्के ते १.७८ टक्के घसरले. दक्षिण कोरियाचा कोसपी मात्र 0.२५ टक्क्यांनी वाढला. युरोपीय बाजारांतही नरमाईचाच कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.४0 टक्के ते १.00 टक्के घसरले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत गेल, वेदांता, भारती एअरटेल, भेल, एचडीएफसी, टाटा स्टील, लार्सन, आयसीआयसीआय बँक, आयटीसी यांचा समावेश आहे. टीसीएस, एनटीपीसी, बजाज आॅटो, सिप्ला, मारुती आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांचे समभाग वाढले.