मुंबई : एक दिवसाच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा घसरले. मुंबई शेअर बाजार ३१७ अंकांनी घसरून २६ हजार अंकांच्या खाली आला आहे. गेल्या पाच सत्रांपैकी ही चौथी घसरण आहे. अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी चिनी सरकारने केलेल्या ताज्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. त्याचा फटका भारतीय बाजारांना बसला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,८00 अंकांच्या खाली घसरला आहे.
बँकिंग, आरोग्य, एफएमसीजी, आयटी, तेल आणि गॅस, भांडवली वस्तू, वाहन, पीएसयू आणि टिकाऊ ग्राहक वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला.
चीनच्या केंद्रीय बँकेने काल व्याजदरात कपात केली होती. बँकांच्या राखीव निधीतही कपात केली होती. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करण्यात आलेल्या या उपायांचा कोणताही उपयोग झालेला नाही. शांघाय कंपोजिट १.२७ टक्क्यांनी घसरला. त्याचा परिणाम म्हणून युरोपीय बाजारही सकाळी घसरणीचा कल दर्शवीत होते.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २६,१५६.६१ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर मात्र तो लगेचच नकारात्मक झोनमध्ये गेला. २६ हजार अंकांच्या खाली डुबकी मारून तो २५,७१४.६६ अंकांवर बंद झाला. ३१७.७२ अंकांची अथवा १.२२ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली.
काल सेन्सेक्स २९0.८२ अंकांनी वाढला होता. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी विशेष सत्र बोलावण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यामुळे बाजाराला बळ मिळाले होते.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८८.२५ अंकांनी अथवा १.१३ टक्क्यांनी घसरून ७,७९१.८५ अंकांवर बंद झाला.
जपानी बाजार उसळला
जगभरातील शेअर बाजार घसरत असताना जपानचा शेअर बाजार मात्र वाढला. टोकियो बाजाराचा निर्देशांक निक्की ५७0.१३ अंकांनी वर चढला.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग घसरले. बीएसईमधील बँकिंग निर्देशांक सर्वाधिक १.६८ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल आरोग्य, तेल आणि गॅस, एफएमसीजी, आयटी आणि भांडवली वस्तू या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले.
स्मॉलकॅप निर्देशांक मात्र या पडझडीतही 0.१६ टक्क्यांनी वाढला. मिडकॅप मात्र 0.७९ टक्क्यांनी घसरला.