मुंबई : केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर यंदा ५.५ टक्के राहील, असा अंदाज जाहीर केल्यामुळे शेअर बाजारांना नवे टॉनिक मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४५ अंकांनी वाढून २७,३७१.८४ अंकांवर बंद झाला.
३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सकाळची सुरुवात वाढीने झाली. त्यानंतर तो सातत्याने सकारात्मक टापूत राहिला. आयटी, धातू, तेल आणि गॅस, भांडवली वस्तू, ऊर्जा या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी दिसून आली. सत्र अखेरीस सेन्सेक्स २४५.२७ अंकांनी अथवा 0.९0 टक्क्यांनी वाढून २७,३७१.८४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने सलग दुसऱ्या दिवशी तेजी दर्शविली आहे. काल सेन्सेक्स ४१६.४४ अंकांनी म्हणजेच १.५६ टक्क्यांनी वाढला होता. ५0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ६५.९0 अंकांनी वाढून ८,२२0.३५ अंकांवर बंद झाला. ही वाढ आदल्या दिवशीच्या तुलनेत 0.७५ टक्के आहे. निफ्टीने ८२00 अंकांचा टप्पा ओलांडल्याने बाजारात उत्साह दिसून आला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग वाढले. उर्वरित ९ कंपन्यांचे समभाग कोसळले. आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, कोल इंडिया, विप्रो, टाटा पॉवर, आरआयएल या कंपन्यांचे समभाग वर चढले. १,४८0 कंपन्यांचे समभाग वाढले. १,४0२ कंपन्यांचे समभाग घसरले.