नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आर्थिक सुधारणांची प्रक्रिया वेगवान करेल त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढण्याच्या अपेक्षेने भारतातील परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.चालू आर्थिक वर्षात ही गुंतवणूक ६० अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज असून मागील वर्षापेक्षा ती दुप्पट होऊ शकते. असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्टी आॅफ इंडिया (असोचेम)ने केलेल्या एका अभ्यासामध्ये ही बाब उघड झाली आहे. अधिकारारूढ होणार्या मोदी सरकारकडून परकीय वित्तसंस्थांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हे सरकार आर्थिक सुधारणांना वेग देईल, त्याचप्रमाणे गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्याचा आशावाद हे गुंतवणूकदार बाळगून आहेत. त्यामुळेच चालू आर्थिक वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणूक मागील वर्षापेक्षा दुप्पट होऊन ६० अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. सन २०१३-१४ मध्ये भारतात २९ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. भारतात सन २०१२-१३मध्ये परकीय वित्तसंस्थांनी सर्वाधिक गुंतवणूक केलेली आहे. या वर्षामध्ये ४६.१७ अब्ज डॉलर भारतात गुंतविले गेले. चालू आर्थिक वर्षात ही रक्कमही मागे पडण्याची शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवीन येणार्या अर्थमंत्र्यांना रिझर्व्ह बँकेच्या साथीने रुपयाचे बळकटीकरण आणि चालू खात्यावरील तूट कमी करणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात देशातील परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात ३५ अब्ज डॉलर हे परकीय वित्तसंस्थांकडून देशात येण्याची अपेक्षा आहे. तसेच २५ अब्ज डॉलर हे थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून येऊ शकतात, असे मत असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारने आर्थिक सुधारणा वेगाने केल्यास तसेच चलनवाढ कमी केल्यास थेट परकीय गुंतवणुकीचा वेग वाढू शकेल, असेही कपूर यांनी स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
विदेशी गुंतवणुकीत होणार विक्रमी वाढ
भाजपाचे सरकार आर्थिक सुधारणांची प्रक्रिया वेगवान करेल त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढण्याच्या अपेक्षेने भारतातील परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे
By admin | Updated: May 27, 2014 06:05 IST2014-05-27T06:05:53+5:302014-05-27T06:05:53+5:30
भाजपाचे सरकार आर्थिक सुधारणांची प्रक्रिया वेगवान करेल त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढण्याच्या अपेक्षेने भारतातील परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे
