Lokmat Money > बिझनेस न्यूज > कांदा ग्राहकांना रडविणार

कांदा ग्राहकांना रडविणार

साठवणुकीमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे़ साठवणुकीसाठी त्यावर रासायनिक पावडरचा वापर केला जातो़ मात्र हा वापर जास्त वाढत असल्याने, कांद्यावर काळसर बुरशीप्रमाणे काही

By admin | Updated: July 28, 2015 04:03 IST2015-07-28T04:03:19+5:302015-07-28T04:03:19+5:30

साठवणुकीमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे़ साठवणुकीसाठी त्यावर रासायनिक पावडरचा वापर केला जातो़ मात्र हा वापर जास्त वाढत असल्याने, कांद्यावर काळसर बुरशीप्रमाणे काही

Onion customers will cry | कांदा ग्राहकांना रडविणार

कांदा ग्राहकांना रडविणार

- राम जाधव, जळगाव
मागील रब्बी हंगामातील कांद्याला अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे कांद्याची प्रत खराब झाली आहे़ तसेच कांद्याच्या उत्पादनात घटही झाली आहे़ त्यामुळे आता भाव वाढत असून येत्या काही दिवसांत कांदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याचे दिसते़
साठवणुकीमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे़ साठवणुकीसाठी त्यावर रासायनिक पावडरचा वापर केला जातो़ मात्र हा वापर जास्त वाढत असल्याने, कांद्यावर काळसर बुरशीप्रमाणे काही घटक आढळून येत आहेत़ त्यामुळेही कांदा ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही़ ही पावडर आरोग्यास हानिकारक असते़ त्यामुळे साठवणूक करणाऱ्यांनी या पावडरचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे़ कांद्यासाठी जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या अडावद बाजारपेठेतही कांद्याची आवक नसल्यागतच आहे़ त्यामुळे येथेही प्रतीनुसार ३० ते ५० रुपये किलोप्रमाणे कांद्याची किरकोळ विक्री होत आहे़ जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्था नाही़ त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांद्याची विक्री केल्याने त्यांना आताच्या भाववाढीचा काहीही फायदा नाही़ जेव्हा -जेव्हा शेतांमध्ये कांद्याचे उत्पादन आले, तेव्हा गारपिटीने व अवकाळीने दणका देऊन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ त्यामुळे यावर्षी कांद्याची प्रत ढासळलेली आहे़

मे-जून महिन्यात २० रुपये प्रति किलोने मिळणारा कांदा जळगावच्या बाजारपेठेत जुलै महिन्यात ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे़ जुलैच्या पहिल्या आठवड्यातच २० रुपयांवरून चढत असलेल्या कांद्याने भाववाढीचे सूतोवाच दर्शविले होते़ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कांदा ३५ ते ४० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत़
त्यातच पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील निघणाऱ्या कांदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ त्यामुळेही कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे़
मे महिन्यात आलेल्या कांद्याला भाव मिळत नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे़ ते आता भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यामुळे सध्या बाजारपेठेत दररोज केवळ २५ टक्क्यांपर्यंतच कांद्याची आवक सुरू आहे़

कांद्याची प्रत ढासळलेली असल्याने त्याची साठवणूक ग्राहकांना करता येत नसल्याने, त्याचा उठाव जास्त होत नाही़ एकूण येणाऱ्या कांद्यापैकी केवळ ५ ते १० टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे़

कृत्रिम टंचाईचा धोका़़़़़़
येत्या काही दिवसात भाव वाढणार म्हणून, काही साठेबाजांकडून कांद्याची साठवणूक होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे़ जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज केवळ २५ ते ३५ टन कांद्याची आवक होत आहे़ तीसुद्धा धुळे, सटाणा, नाशिक आणि वरणगाव परिसरातील कांद्याची आहे़

Web Title: Onion customers will cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.