- मनोज गडनीस, मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणा आणि अर्थव्यवस्थेला मजबुती देणाऱ्या काही ठोस घोषणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पावणेदोन महिन्यांत
मुंबई शेअर बाजाराच्या ‘श्रीमंती’त तब्बल ११ लाख कोटींची भर पडली आहे. बाजारमूल्यात ११ लाख २७ कोटींची वाढ होत हे मूल्य आता ९७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा आजवरचा विक्रमी उच्चांक आहे.
मुंबई शेअर बाजारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याच्या दिवशी (२९ फेब्रुवारी २०१६) बाजारातील नोंदणीकृत कंपन्या, त्यांची उलाढाल आणि त्यांचे एकत्रित बाजारमूल तपासले तर तो आकडा ८५ लाख ८३ हजार कोटी रुपये इतका होता. राष्ट्रीय शेअर बाजारातून उपलब्ध माहितीनुसार, केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्पानंतर परदेशी वित्तीय संस्था भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून या वित्तीय कंपन्यांनी गेल्या पावणे दोन महिन्यांत तब्बल २६ हजार ४४० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली आहे.
अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या घोषणा तसेच कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेले नियोजन, तसेच यंदाच्यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज, औद्योगिक उत्पादनाची सुधार दिसून आलेली स्थिती, परदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि निर्यातीतही दिसून आलेला सुधार, याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहे. त्यातच, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्थात नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनेही पाव टक्क्यांनी दर कपात केल्यामुळे उद्योगाला मोठा फायदा होणार असल्यामुळे बाजाराचे मनोबल अधिक उंचावले आहे. यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर तेजी दिसून आली असल्याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ अजित जोशी यांनी केले.
३२७ कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी वाढ
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निर्माण झालेल्या तेजीचा सर्वाधिक फायदा सुमारे ३२७ कंपन्यांना झाल्याचे दिसून आले असून या कंपन्यांच्या बाजारमूल्यात २० टक्क्यांपर्यंत घसघसीत वाढ झाली आहे.
‘एम-कॅप’ श्रेणीतील टीसीएसच्या बाजारमूल्यात ७० हजार कोटी रुपयांनी वाढ होत ते पाच लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँक या ‘एम-कॅप’ श्रेणीतील अन्य दोन महत्वपूर्ण कंपन्यांच्या बाजारमूल्यात अनुक्रमे ३५ हजार कोटी रुपये व ३० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
२६ हजार ४४0 कोटी
रुपये परदेशी वित्तीय कंपन्यांनी नवी गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली आहे. अर्थसंकल्पानंतर गेल्या पावणे दोन महिन्यात ही गुंतवणूक केली आहे.