सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्र शांती सेना अत्यावश्यकच आहे मात्र बदलत्या काळात विविध देशात शांती सेनेच्या प्रयत्नांमधे अडथळे निर्माण करण्याचे काम दहशतवाद्यांचे काही सशस्त्र गट व निवडक नॉन स्टेट अॅक्टर्स करीत आहेत. माणुसकीच्या भावनेने जागतिक शांततेसाठी कार्यरत असलेल्या शांती सेनेपुढे त्यामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. यजमान देशाने शांती सेनेच्या कार्यात केवळ मदतच नव्हे, तर या सेनेच्या मिशनशी सूसूत्रता राखणेही आवश्यक आहे. अन्यथा त्यातून नवी संकटे निर्माण होतील. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने त्यात लक्ष घालावे, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी लंडन येथे आयोजित जागतिक शांती सेना परिषदेत केले.
संघाने ७0 वर्षात विविध देशात शांती सेना पाठवण्याच्या ज्या ७१ मोहिमा आखल्या त्यापैकी ५0 मोहिमांमधे भारतीय जवान सहभागी होते. इतकेच नव्हे, तर शांती सेनेतल्या २ लाख ३0 हजार भारतीय जवानांनी जागतिक शांततेसाठी चालवलेल्या मोहिमांमधे स्वत:च्या प्राणांचे बलिदानही दिले, याचा आवर्जून उल्लेख करीत डॉ. भामरे म्हणाले, न्यूयॉर्क येथील राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान मोदींनी वचन दिल्यानुसार भारत यापुढेही शांती सेनेच्या मोहिमांमधे अग्रक्रमाने सहभागी होईल. तसेच शांती सेनेत सहभागी अन्य देशातल्या अधिकारी व जवानांना बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षणही भारतीय तळांवर दिले जाईल. भारतात ३५ देशातले ११४ शांती सैनिक सध्या प्रशिक्षण घेत आहेत.
>नेतृत्व संधीबाबतही निश्चित धोरण ठरवण्यात यावे
लंडनची शांती सेना परिषद हा न्यूयॉर्क येथील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेचा उत्तरार्ध होता. परिषदेत संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेना विभागाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेताना, शांती सेनेची गुणात्मक, तांत्रिक क्षमता वाढवावी, पलटणीत सहभागी सैनिकांना नेतृत्व संधीबाबतही निश्चित धोरण ठरवण्यात यावे, असे आवाहनही भामरेंनी केले.