खरीप हंगामच संकटात
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:23+5:302014-07-12T22:06:23+5:30

खरीप हंगामच संकटात
>भात वाटिका कोमेजल्या, तर पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर, दौंडमध्ये रब्बी घेण्याचा सल्ला पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, चाळीस टक्के भात रोप वाटिका संकटात सापडल्या आहेत. तर पुरंदर, बारामती, इंदापुर, शिरुर व दौंडमध्ये येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास येथील शेतकर्यांना खरीपाचा हंगाम कोरडा घालवा लागणार आहे. त्या ऐवजी त्यांनी थेट रब्बी पिके घ्यावीत असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीत जिल्ह्यातील कृषी परिस्थितीचा देखील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ११ जुलै अखेर केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या असून, खरीपाची स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्यात भाताचे ६० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यासाठी साडेपाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पावसाने ओढ दिल्याने त्यातील चाळीस टक्के भात रोपवाटिका बाधित झाल्या असून, त्यातील २५ ते तीस टक्के वाटिका उद्धवस्थ झाल्या आहेत. गेले काही दिवस होत असलेल्या रिमझिम पावसामुळे काही वाटिकांना जीवदान मिळाले आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलस्त्रोत असलेल्या ठिकाणी शेतकरी गटांनी एकत्र येऊन भात रोपवाटिका केल्यास, त्यांना बियाणे खतांसाठी ४८ हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच रोपांचा कालावधी कमी होण्यासाठी रहू पद्धतीने वाटिका करावी. बियाणे चोवीस तास पाण्यात भिजत ठेवून, नंतर ते भिजलेल्या गोणपाटात दोन दिवस ठेवावे. कोंब आलेले बियाणे वाटिकेच्या ताफ्यावर टाकल्यास त्याचा फायदा होतो. पेरणी लांबल्याने एका ऐवजी तीन ते चार रोपांची पेरणी करावी लागेल. मात्र पाऊस लांबल्यास १५ ते २० जुलै दरम्यान डोंगरमाथ्यावरील जमिनीत भाता ऐवजी नाचणी घ्यावी. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, तसेच खेड व आंबेगावच्या काही भागात ही पद्धत वापरावी असा सल्ला बोटे यांनी दिला आहे.