नवी दिल्ली : भारतात कारच्या विक्रीत सलग सातव्या महिन्यात वृद्धी झाली असून मे महिन्यात ती ७.७३ टक्के वाढलेली होती. कारची वाढलेली विक्री हे बाजारपेठेची मंदावलेली परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे चिन्ह समजले जात आहे. मात्र मोटारसायकलच्या विक्रीतील घट काळजीचा विषय बनला आहे.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगने (सियाम) प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कारची विक्री गेल्या मेमध्ये १,६०,०६७ झाली, ती २०१४ च्या मेमध्ये १,४८,५७७ झाली होती. सियामचे महासंचालक विष्णू माथूर यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, सध्या तरी आम्ही मंदगतीने होणाऱ्या सुधारणांच्या काळात आहोत. कार्सच्या विभागात विक्रीत वृद्धी दिसत
असली तरी ती पूर्ण क्षमतेने झालेली दिसत नाही. ते म्हणाले की, मोटारसायकल आणि हलक्या व्यापारी वाहनांच्या कमी झालेल्या विक्रीने हेच दिसते की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत सगळेच काही योग्य चालले आहे, असे म्हणता येत नाही. मोटारसायकलच्या विक्रीत गेल्या महिन्यात ३.०४ टक्के घट होऊन त्यांची ९,५३,३२२ एवढी विक्री झाली. ही विक्री गेल्या वर्षी मेमध्ये ९,८३,२१० होती. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री ७.१९ टक्क्यांनी घटून २८,२२६ वाहने विकली गेली. गेल्या वर्षी हीच विक्री ३०,४१४ एवढी होती. माथूर म्हणाले की, सप्टेंबर २०१४ मध्ये झालेली वाढ वगळता हलक्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत गेल्या २५ महिन्यांत घटच झालेली आहे. ग्राहकांचा कल अनुकूल असून बँकांनी व्याजदरात केलेली कपात ग्राहकांपर्यंत पोहोचली तर कार्सची मागणी वाढू शकते. मेमध्ये बाजारातील प्रमुख कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीमध्ये १४.२९ टक्क्यांची वाढ होऊन ती ८५,१९० पर्यंत गेली.