लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात गोंधळ उडाल्यानंतरही सोमवारी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचले. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स ३५५ पेक्षा जास्त अंकांनी वाढून ३१,७१५.६४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टीही ९,७00 अंकांची पातळी ओलांडून पुढे गेला.
सकाळच्या सत्रात एनएसईमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामकाज विस्कळीत झाले. समभागांच्या किमती यंत्रणेत अपडेट होत नव्हत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रोख आणि एफ अँड ओ श्रेणीतील व्यवहार थांबविले. दुपारी १२.३0 वा. व्यवहार सुरळीत झाले. या प्रकाराची वित्त मंत्रालयाने दखल घेतली असून अहवाल सादर करण्याचे आदेश सेबीला दिले आहेत. हा प्रकार तांत्रिक बिघाडाचा होता, हॅकिंगचा नव्हे, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाने केल्या आहेत.
एनएसईचे व्यवसाय विकास विभागप्रमुख रवी वाराणसी यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडाची अंतर्गत चौकशी केली जात आहे. तांत्रिक बिघाडाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आपल्या १0 हजार कोटींच्या आयपीओच्या मंजुरीची प्रतीक्षा असताना एनएसईला अशाच बिघाडाचा सामना करावा लागला होता. काही दलालांना प्राधान्याने संपर्क सुविधा देण्यात आल्याच्या आरोपाचीही चौकशी केली जात आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ३५५.0१ अंकांनी वाढून ३१,७१५.६४ अंकांवर बंद झाला. २५ मेनंतरची ही सर्वांत मोठी एकदिवसीय वाढ ठरली आहे. तसेच हा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी १0५.२५ अंकांनी वाढून ९,७७१.0५ अंकांवर बंद झाला. ६ जूनचा सार्वकालिक उच्चांकी बंदचा विक्रम निफ्टीनेही मोडला.
सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा समभाग सर्वाधिक ५.३९ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल टीसीएस आणि विप्रो यांचे समभाग वाढले. कोल इंडिया, लुपीन, इन्फोसिस, सन फार्मा, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एसबीआय, एल अँड टी, अॅक्सिस बँक, अदाणी पोर्टस, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज, टाटा स्टील, बजाज आॅटो आणि सिप्ला यांचे समभागही वाढले. याउलट एम अँड एम, आयटीसी, हिंद युनिलिव्हर यांचे समभाग नफा वसुलीमुळे घसरले.
>अखेर दिलगिरी
एनएसईने एक निवेदन जारी करून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. हे प्रकरण तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीकडे सोपविण्यात आले आहे.
वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणी एनएसईकडून सेबीला अहवाल पाठविला जाईल. सेबीकडून आम्हाला तो प्राप्त होईल. दिवसअखेरीसच यासंबंधीचा अहवाल अपेक्षित आहे.
एनएसईतील गोंधळानंतरही शेअर बाजार विक्रमी उंचीवर
तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात गोंधळ उडाल्यानंतरही सोमवारी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचले.
By admin | Updated: July 11, 2017 00:01 IST2017-07-11T00:01:27+5:302017-07-11T00:01:27+5:30
तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात गोंधळ उडाल्यानंतरही सोमवारी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचले.
