>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही विमानानं पर्यटनाला जाणार असाल, तर आत्ताच तिकिटं बुक करा कारण विमान प्रवास किमान 5 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये केंद्र सरकारने एअर टर्बाइन फ्युएल किंवा विमानांच्या इंधनावरील एक्साइज ड्युटी 8 टक्क्यांवरून वाढवून 14 टक्के केली आहे. त्याखेरीज राज्या राज्यांमध्ये बदलणारा विक्री कर 4 ते 30 टक्के आहे आणि तो एक्साइज ड्युटी लावल्यानंतर मोजला जातो त्यामुळे पडणारा भार आणखी जास्त आहे. शिवाय अर्धा टक्क्याचा कृषि कल्याण उपकरही लागू करण्यात येत आहे.
या सगळ्याचा परिणाम म्हणून विमान तिकिटांचे दर किमान पाच टक्क्यांनी वाढतिल असा अंदाज. ही भाववाढ एक एप्रिल नंतर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी लागल्यानंतर पर्यटनासाठी जाऊ इच्छिणा-यांना पहिल्यांदा भाववाढीचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे.
जागतिक बाजारामध्ये इंधनाचे दर कोसळल्यामुळे काहीशा स्थिरावलेल्या व फायद्यात येण्याची स्वप्ने बघायला लागलेल्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक्साईज ड्य़ुटीतील वाढ निराशाजनक ठरली आहे. मुळात विक्री कर कमी व्हावा यासाठी गेले दशकभर सगळ्या विमान कंपन्या विनवणी करत होत्या, ते राहिले बाजुला उलट एक्साईज वाढल्यामुळे स्थिती आणखी बिकट होणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले आहे.
2015 मध्ये खनिज तेलाचे भाव 35 टक्क्यांनी घसरले जे या वर्षी 5.4 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात विमानाचं इंधन 60 टक्क्यांनी महाग असल्याची व्यथा या क्षेत्रातील काही अधिका-यांनी व्यक्त केली आहे.