रूपेश उत्तरवार, यवतमाळ
कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली आहेत. राज्यातील १७ हजार शेतक-यांना २९ कोटी रुपयांची अवजारे या योजनेतून दिली जाणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये प. महाराष्ट्र आघाडीवर आहे.
राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविले जाणार आहे. राज्यात १६ हजार ९७० औजारे वितरित केले जाणार आहे. या अवजारांंच्या खरेदीसाठी २९ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
अनुसूचित जाती, जमाती आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसोबत महिला शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित औजारे, उपकरणे, ट्रॅक्टरवरील औजारे, प्राणीचलित अवजारे, पीक संरक्षण उपकरणे यांचा समावेश आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी सर्वसाधारण शेतकऱ्याला एक लाखाचे अनुदान दिले जाणार आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना एक लाख २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पॉवर टिलरसाठी सर्वसाधारण शेतकऱ्याला ६० हजारांचे अनुदान तर अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.