Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मटार १६० रुपये किलो !

मटार १६० रुपये किलो !

आधी कांद्याच्या, नंतर टॉमेटोच्या भाववाढीने ग्राहकाला चिमटा घेतला. आता मटार तो घेत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये मटार सर्वात महाग म्हणजे १६० रुपये

By admin | Updated: November 19, 2015 01:34 IST2015-11-19T01:34:41+5:302015-11-19T01:34:41+5:30

आधी कांद्याच्या, नंतर टॉमेटोच्या भाववाढीने ग्राहकाला चिमटा घेतला. आता मटार तो घेत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये मटार सर्वात महाग म्हणजे १६० रुपये

160 kg of peas! | मटार १६० रुपये किलो !

मटार १६० रुपये किलो !

नवी दिल्ली/चंदीगड : आधी कांद्याच्या, नंतर टॉमेटोच्या भाववाढीने ग्राहकाला चिमटा घेतला. आता मटार तो घेत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये मटार सर्वात महाग म्हणजे १६० रुपये किलो झाले. हेच मटार काही दिवसांपूर्वी ९० ते १०० रुपये या भावाने विकले जात होते, असे व्यापाऱ्याने सांगितले.
मटारच्या भावाचा हा सार्वकालिक उच्चांक असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. पंजाब आणि हरियाणा आणि या दोघांची सामाईक राजधानी चंदीगडमध्ये किरकोळ विक्रेत्यांकडे गोठवलेल्या मटारची अचानक मागणी वाढल्यामुळे ते महाग झाले व त्यांची टंचाईदेखील निर्माण झाली आहे. या गोठवलेल्या वाटाण्यांचे वेगवेगळे प्रकार १३० ते १९० रुपये किलो या दरम्यान उपलब्ध आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात ३५ रुपये किलोचे टॉमेटो आता ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बटाटेही आता थोड उतरू लागले आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी २५ रुपये किलो असलेले बटाटे आता १५ रुपये किलो झाले आहेत. स्थानिक माल बाजारात येऊ लागल्यामुळे बटाटे उतरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात टॉमेटो आणि मटारप्रमाणेच इतरही सर्वच भाज्या महागाईच्या वाटेवर असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी सांगितले की, गाजरांचा भाव ४0 ते ५0 रुपये किलो झाला आहे. शेवग्याच्या शेंगा ७0 रुपये किलो झाल्या आहेत. या संपूर्ण महिन्यात भाजीपाला कडाडलेलाच राहिल असे दिसते. पुढच्या महिन्यात भाव उतरण्याची शक्यता आहे. कारण नव्याने लागवड झालेल्या पिकांचा माल पुढील महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.
बासमती तांदूळ आणखी महागला
कमी उत्पादनाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर साठा करून ठेवणाऱ्यांनी खरेदी वाढविल्यामुळे बुधवारी येथील धान्य बाजारात बासमती तांदळाचे भाव क्विंटलमागे आणखी २०० रुपयांनी वाढले. पुरेसा साठा आणि औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्यामुळे बाजारात घट झाली. बाजारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप उत्पादनात घट होण्याची शक्यता व त्याचा साठाही कमी असल्यामुळे बासमती तांदळाचे भाव वाढले.
शिवाय साठा करून ठेवणाऱ्यांनी खरेदी वाढविल्यामुळेही त्याचे भाव वाढले. सामान्य बासमती व पुसा ११२१ जातीच्या तांदळाचे भाव अनुक्रमे ४८००-४९०० रुपये आणि ४०००-४६०० पासून वाढून ५०००-५१०० आणि ४१००-४८०० रुपये क्विंटलला बंद झाले. औद्योगिक क्षेत्रातून मागणी नसल्यामुळे बाजारातील त्याचा भाव १५ रुपयांनी स्वस्त होऊन १२८५-१२९५ रुपये क्विंटलला बंद झाले.

जप्त ५३६६ टन डाळ खुल्या बाजारात
वेगवेगळ्या राज्यांत साठेबाजांकडून जप्त करण्यात आलेली ५३६६ टन डाळ खुल्या बाजारात डाळींचा पुरवठा वाढून त्यांचे भाव खाली येण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. टंचाई व साठेबाजीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यांनी राबविलेल्या मोहिमेमध्ये १.३२ लाख टन डाळी जप्त केल्या होत्या. खुल्या बाजारात सध्या तुरीच्या डाळीचा किरकोळ विक्रीचा भाव १८० रुपये किलो आहे. प्रतिकूल हवामानामुळे २०१४-२०१५ या वर्षात देशात डाळींचे उत्पादन २० लाख टनांनी कमी झाले आहे.
या उपायामुळे डाळींचे भावही कमी होतील. ही ५,३६६ टन डाळ छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, ओडिशा, मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने आपल्या बाजारात उपलब्ध केली आहे.
राज्यांकडून मिळालेल्या अहवालानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत साठेबाजांविरोधातील कारवाईतून ५,३६६.१८ टन डाळ लिलाव व इतर पर्यायांद्वारे किरकोळ बाजारात त्यांचा पुरवठा वाढण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
डाळींच्या साठवणुकीची मर्यादा राज्यांनी निश्चित केल्यानंतर १७ नोव्हेंबर २०१५ पर्यंत १,३२,७७७.१४ लाख टन माल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: 160 kg of peas!