राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशाराभारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सायंकाळी ५.३० पासून ते दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या सकाळी ५.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० पर्यंत ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाउंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लवकरच जोर ओसरणार◼️ मध्य भारतावर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.◼️ गेल्या काही दिवसांच्या तुलनेत २० तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कमी होईल, परंतु काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; राधानगरी, कोयना तसेच अलमट्टी धरणांची काय परिस्थिती?