मुंबई : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण वर्षभर सोबत राहणारी, आजूबाजूला दिसणारी सावली काही मिनिटासाठी नेमकी पायाखाली येते आणि क्षणभर सावली दिसेनाशी होते.
असे शून्य सावलीचे दिवस महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत आहेत. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडे असतो.
म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्तदरम्यान असणाऱ्या सर्व भूभागांवर वर्षातून दोनदा दुपारच्या वेळेस सूर्य डोक्यावर येतो. दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.
१० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो; तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मेपर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस असतो.
भोपाळजवळून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
कसे कराल निरीक्षण?
दुपारी १२ ते १२:३५ वाजेपर्यंत
साहित्य आणि कृती
◼️ दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, उन्हात सरळ उभी ठेवावी.
◼️ सूर्य डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
कोणत्या शहरात, कोणत्या तारखेला?
७ - रत्नागिरी, सांगली.
८ - कऱ्हाड, अफजलपूर.
९ - चिपळूण, अक्कलकोट.
१० - सातारा, पंढरपूर, सोलापूर.
११ - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई.
१२ - बारामती, बार्शी, धाराशिव.
१३ - पुणे, लातूर.
१४ - लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड.
१५ - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा.
१६ - बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहिल्यानगर, परभणी, नांदेड.
१७ - नालासोपारा, विरार.
१८ - पालघर, कसारा, संगमनेर, हिंगोली.
१९ - छत्रपती संभाजीनगर, डहाणू, नाशिक, कोपरगाव, जालना.
२० - चंद्रपूर, वाशीम.
२१ - मनमाड, गडचिरोली.
२२ - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ.
२३ - अकोला.
२४ - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा.
२५ - जळगाव, भुसावळ, अमरावती.
२६ - नागपूर, भंडारा.
२७ - नंदुरबार, चिखलदरा, गोंदिया.
२८ - अक्कलकुआ, शहादा.
२९ - बोराड, नर्मदा नगर.
३० - धाडगाव.
३१ - तोरणमाळ.
अधिक वाचा: वडिलांच्या कोणत्या संपत्तीवर मुलांचा नेमका किती हक्क असतो? वाचा काय सांगतो कायदा?
