प्रवीण निपाणे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण ५४ टक्के भरलेले असतानाही, वैजापूर तालुक्यातील ४० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरींनी तळ गाठल्याने पिके धोक्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांची भटकंती सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली असून, यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे साकडे घातले आहे.
यंदा धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा, ऊस आणि मक्याची मोठी लागवड केली होती. मात्र, आता विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. पिकांना पुढील ८ ते १० दिवसांत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरूनही प्रशासन पाणी सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. आम्ही पाणी आरक्षणाबाबत ओएसडी साने यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकरी डिमांड भरण्यास तयार असूनही अधिकारी चालढकल करत असल्याचे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेळके यांनी सांगितले.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण सरोवर म्हणाले की, फेब्रुवारीत पहिले आवर्तन मिळाले, तेव्हाच दोन आवर्तनांचे आश्वासन दिले होते. आता केवळ ७ ते ८ टक्के पाणी सोडल्यास धरण ४६ टक्क्यांवर राहील. तरीही पाणी दिले जात नाही. तातडीने पाणी न सोडल्यास आम्ही आंदोलन करू.
प्रशासनाची भूमिका
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अश्फाक शेख यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केच पाणी शिल्लक आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. भविष्यातील टंचाई लक्षात घेता दुसरे आवर्तन देणे शक्य नाही.
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक