Join us

पूरस्थिती टाळण्यासाठी यंदा उजनीत पाणीसाठा राहणार कमी; वाचा धरण व्यवस्थापकांनी काय केलेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:28 IST

Ujine Dam : आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे.

आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीत जाऊ नये, यासाठी उजनी धरणाचीपाणी पातळी ७० टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्यात येणार आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त पाऊस झाल्यास साधारण २० टीएमसीपर्यंत पाणी रिकामे ठेवण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापक अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली.

उजनी धरनाची १२३ टीएमसी क्षमता आहे. सध्या १०२ टीएमसी पाणीसाठा उजनी धरणात आहे. मंगळवारी सकाळी आणखी ५ हजार क्युसेक विसर्ग वाढवून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आला असून एकूण ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे.

सायंकाळी ६ वाजता उजनीची पाणी पातळी ७२.९९ टक्के होती. ७७ टक्क्यावर उजनीची पाणी पातळी गेली होती. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले नसते तर उजनीची पाणी पातळी २० टक्क्यांपर्यंत गेली असती.

गेल्या २ दिवसात ५ टक्के कमी झाले आहे. १० ऑक्टोबर २०२० मध्ये एकाच दिवसात उजनी धरण परिसरात २४० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने पंढरपूर येथे अचानक पूरस्थिती निर्माण झाली होती.

तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडण्यात येत आहे. सध्या उजनीत एकूण १०२.७६ टीएमसी पाणीसाठा असून ३९.१० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

२०२० मध्ये उद्भवली होती पूरस्थिती

• उजनी धरणाची क्षमता पूर्ण होत आल्यास जेवढा दौंड येथून विसर्ग उजनीत मिसळतो. तेवढा भीमा नदीत सोडण्यात येतो. १५ ऑक्टोबर २०२० मध्ये दौंड येथील विसर्ग केवळ ३ हजार ७०० क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत होता.

• तर त्याच रात्री उजनीतून २ लाख ४० हजार क्युसेकपर्यंत उजनीतून विसर्ग वाढवला होता. २००५ नंतर २०२० मध्ये पंढरपूर येथे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा : तृणधान्य व कडधान्यांच्या जागी आता ऊस, द्राक्ष, डाळिंब; 'टेंभू'ची साथ अन् बदलत्या पीक पॅटर्नने शेतकऱ्यांना केले मालमाल

टॅग्स :उजनी धरणकोल्हापूर पूरपाणीनदीधरणजलवाहतूक