मे महिन्यात पूर्वहंगाम व रोहिणी नक्षत्रात यंदा राज्यात सर्वच जिल्ह्यात पाऊस पडला असला तरी जालना व सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी सतरा दिवस, तर त्यानंतर अहिल्यानगर, धाराशिव व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी सोळा दिवस पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, २०२० ते २४ या पाच वर्षात मेमध्ये एकूण पडलेल्या पावसापेक्षा यंदाच्या मे महिन्यात अधिक पाऊस पडला असल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारी सांगतेय.
राज्यात पूर्वहंगाम पावसाला १२ मे रोजी सुरुवात झाली. १२ ते १८ मेदरम्यान राज्यात दररोज दोन ते तीन मि.मी. पाऊस पडला. या कालावधीत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर बऱ्याच ठिकाणी किरकोळ पाऊस पडला. १९ मेनंतर पावसाने झोडपून काढल्याने यंदाचा मेमधील पाऊस उच्चांकी ठरला आहे.
मे महिन्यात जालना व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी सतरा दिवस, धाराशिव, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी सोळा दिवस, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी पंधरा, तर रत्नागिरी, नाशिक, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी चौदा दिवस पाऊस पडला आहे.
राज्यात २०२० ते २४ या पाच वर्षात मे महिन्यात एकूण १५२ मि.मी. पाऊस पडला तर यंदाच्या मे महिन्यात १८७.६ मि.मी. पाऊस झाला आहे. मे महिन्याचा राज्याचा पाऊस सरासरी १७ मि.मी. इतका आहे.
रायगड अन् धाराशिव..
• मे महिन्यात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक २९८.७ मि.मी., धाराशिव जिल्ह्यात २९८ मि.मी. तर साताऱ्यात २२६ मि.मी. पाऊस पडला आहे. कोकणातील रायगड इतका पाऊस मराठवाड्यातील धाराशिवमध्ये झाला आहे. जालना, बीड, लातूर, पुणे, कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात २०० मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
• मे महिन्यात राज्यातील २७ जिल्ह्यांतील ५९८ मंडलांत अतिवृष्टी झाली असून, रत्नागिरीतील ६३ मंडलात रायगड- ५०, सातारा-४९, बुलढाणा- ४६, पुणे-४४, सिंधुदुर्ग- ४३, सातारा व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी ३६, तर धाराशिव जिल्ह्यात ३१ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.