बाळासाहेब बोचरे
यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने दरवर्षी मे-जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणांत गत वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणे ३७ टक्के भरली आहेत.
गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी २० टक्क्यांच्या खाली असणारी धरणे यंदा ३७ टक्के भरल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूर विभागात पावसाने ओढ दिली असली तरी विभागातील जलसाठे ३० टक्के भरलेले आहेत.
राज्यात १३८ मोठी धरणे असून त्यामध्ये आजच्या घडीला ३६.८८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी तो केवळ १७.०७ टक्के होता.
मध्यम प्रकल्पात ४२.७४ टक्के साठा
राज्यात २६० मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पात ४२.७४ टक्के जलसाठा झाला आहे. गतवर्षी जूनमध्ये तो ३१.१७टक्के होता. लघु प्रकल्प २५९९ असून त्यामध्ये ३३.२७ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी तो २४.०९ टक्के होता.
लहानमोठे २९९७ प्रकल्प
राज्यात लहानमोठे मिळून २९९७ जलसाठे असून त्यामध्ये ३७.१५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी तो २०.०१ टक्के होता.
कोणत्या विभागातील धरणांत किती साठा ?
विभाग | एकूण धरणे | जलसाठा | गतवर्षीचा जलसाठा |
नागपूर | ३८३ | ३१.६१% | ३५.७०% |
अमरावती | २६४ | ३९.०६% | ३६.८१% |
छत्रपती संभाजीनगर | ९२० | ३१.४९% | ९.२२% |
नाशिक | ५३७ | ३६.९५% | २२.५२% |
कोकण | १७३ | ४४.५३% | २८.९६% |