अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत, तर सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
हे वादळ रविवारी ओमानकडे सरकणार आहे, पण सोमवारी मात्र हे चक्रीवादळ वळण घेईल आणि त्याचा प्रवास उलट म्हणजे गुजरातच्या दिशेने सुरू होईल. दरम्यान या वादळाला 'शक्ती' हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे.
६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम पाऊस
• गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात 'तौकते' (२०२१) आणि 'बिपरजॉय' (२०२३) यांसारखी वादळे आली होती; परंतु बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची संख्या कमी आहे.
• या वादळाला 'शक्ती' हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे. उष्ण कटिबंधात चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रालगतच्या १३ देशांनी सुचवलेली नावे अशा वादळांना दिली जातात.
• रविवारी उत्तर भारतात हिमालयाकडे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार होईल. या बदलामुळे हवेतला ओलावा वाढण्याची शक्यता आहे.
• परिणामी, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली.