कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाला आहे. धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात २ इंचांनी कमी झाली असून, अद्याप ५१ बंधारे पाण्याखाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी सकाळपासून तुरळक सरी वगळता उघडीप राहिली. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात अधूनमधून का असेना पाऊस कोसळत राहिला. कोल्हापूर शहर, करवीर, कागल, हातकणंगले तालुक्यात ऊन पडले होते.
धरणक्षेत्रातही पाऊस एकदमच कमी झाल्याने तुळशीसह वारणा, दूधगंगा धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ३१००, वारणातून १६३०, तर दूधगंगा धरणातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अलमट्टी ७० टक्के भरले
अलमट्टी धरण शनिवारी ७० टक्के भरले. सध्या धरणात प्रतिसेकंद १ लाख २ हजार घनफूट पाण्याची आवक, तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पडझडीत ६.४५ लाखांचे नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २० खासगी मालमत्तांची पडझड होऊन सहा लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.