देशात व महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आपण अनुभवतो आहे. जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत अधिकृत मान्सून संपल्यानंतरही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात ढगफुटीच्या घटना तीव्रतेने वाढल्या आहेत.
हवामान बदल (क्लायमेट चेंज), वाढते तापमान, प्रदूषण, शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेप ही मान्सून पॅटर्न बदलाची मुख्य कारणे आहेत. गेल्या दहा वर्षांत ढगफुटीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, वातावरणाची वाढलेली आर्द्रता धारणशक्ती, अस्थिरता आणि क्युम्युलोनिंबस ढगांचे अचानक वाढलेले आवरण यामुळे रात्रीच्या वेळी अचानक डाउनड्राफ्ट (हवेचा वरून खाली येणारा झोत) मुळे महाराष्ट्रात होणाऱ्या ढगफुटीची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
२०२० पासून दरवर्षी महाराष्ट्रात किमान १०० ढगफुटी (फ्लॅशफ्लड) होत आहेत, ज्या अतिवृष्टी, महावृष्टी, तसेच ढगफुटीसदृश पाऊस असा जागतिक हवामान संघटनेने अवैज्ञानिक ठरविलेला शब्दप्रयोग करीत गांभीर्य कमी करीत लपविल्या जात आहेत.
१९१५ ते २०२५ पर्यंतच्या डेटा विश्लेषणानुसार, वाढलेली उष्णता आणि आर्द्रता यामुळे मान्सून लांबतो, अस्थिर आणि अनियमित होतो. यंदा राज्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के जास्त पाऊस झाला असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 'वेट ड्रॉट' (Wet Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित संशोधन व उपाययोजनेतून शीघ्र आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन शक्य आहेत.
पावसाचा फटका कृषी क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, रब्बी हंगामावरही परिणाम होईल. यंदा जास्त पावसानंतर हिवाळा उबदार राहील, ज्यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल आणि रब्बी पिकांच्या उत्पादनात ५ ते २५ टक्के घट होऊ शकते. जीएसटी १० ते १३ टक्के कमी करूनही यंदा दिवाळीत महागाईचे चटके व नियोजनाचे झटके किचनला बसणार आहेत.
पुढील काळात असा पाऊस !
• ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तीव्र पाऊस सुरू राहील, दिवाळीतही विखुरलेला पाऊस पडू शकतो. मान्सूनची सप्टेंबरअखेर झालेली सुरुवात माघार डिसेंबर किंवा जानेवारी २०२६ पर्यंत लांबत अनेक नवीं आव्हाने समोर आणणार आहेत, ज्याचा आपल्या सर्वांना धैर्याने मुकाबला करायचा आहे.
• ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये सोलापूर, धाराशिव (बीड), कोल्हापूर, सांगली, पुणे (घाट भाग), रत्नागिरी आणि विदर्भात ढगफुटींची संख्या व तीव्रता वाढू शकेल. एक ते दोन तासांत २०० ते ४०० मिमी पाऊस पडण्याची शक्यता पाहता जलनिस्सारण नियोजन व धरणातील जलसाठे किमान २५ टक्के कमी करणे ही अपरिहार्य गरज आहे.
हॅम रेडिओ : आपत्तीतील संवादसाधक देवदूत!
ढगफुटी, पूर किंवा वीजपुरवठा खंडित होणे, मोबाइल ४जी/५जी नेटवर्क कोलमडले तरी इलेक्ट्रॉनिक्स हॅम रेडिओ (एमेच्योर रेडिओ) आपत्तीतील संवादसाधक देवदूत आहे. हायरम पर्सी मॅक्सिम यांनी १९१४ मध्ये अमेरिकन रेडिओ रिले लीग (ARRL) स्थापन केली, जी आजही जगातील सर्वांत मोठी हॅम संस्था आहे. भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (एनआयडीएम) आणि इतर संस्था याचा वापर करतात. हे स्वतंत्र, इन्फ्रास्ट्रक्चर-मुक्त असते.
हे उपाय हवेत !
• अफवा व भीती न पसरवता, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन, नागरिक आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यात ढगांचा जणू एक्स रे काबत इत्थंभूत माहिती देणारे एक्स बैंड डॉप्लर रडार नेटवर्क तत्काळ २४ बाय ७ बाय ३६५ कार्यान्वित होण्याची गरज आहे.
• आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), पीएलसी, स्काडा आदी प्रगत इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित हे नेटवर्क तातडीने कार्यान्वित करून कस्टमाइज पद्धतीने मागणीनुसार रियल टाइम वेदर अलर्ट व वेदर इन्फॉर्मेशन देशातील १५० कोटी जनतेला मोबाइलवर देऊ शकणारे सक्षम असेल. एक्स बैंड डॉप्लर रडार नेटवर्क ढगफुटी, पूर आणि तीव्र पावसाची अंदाज नव्हे तर अचूक माहिती देईल.
• ज्यामुळे अक्षांश-रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची यानुसार रियलटाइम कस्टमाइज्ड अलर्ट मोबाइलवर पाठवेल. यामुळे नागरिकांना वैयक्तिकृत माहिती मिळेल. परिणामी विशिष्ट भागातील धोका टाळण्यासाठी त्वरित निर्णय घेता येतील. एडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजमुळे हवामानातील अस्थिरता ओळखून आपत्ती, तसेच जीवित हानी आणि वित्तहानी कमी करण्यात निश्चित मदत ठरेल.
प्रा. किरणकुमार जोहरे
हवामान संशोधक