Yeldari Dam Water Release : चालू रब्बी हंगामातील पिकांना दिलासा देत आणि सुरू झालेल्या उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर येलदरी धरण येथून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. (Yeldari Dam Water Release)
पूर्णा प्रकल्पांतर्गत वीज निर्मितीच्या तीन संचांपैकी दोन संचांमधून दररोज सुमारे ४ दलघमी (MCM) पाणी सोडण्यात येत असून, हे पाणी सिद्धेश्वर धरण येथे नदीमार्गे पोहोचवले जात आहे.
यामुळे येलदरी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या रब्बी व उन्हाळी पिकांना आवश्यक सिंचन उपलब्ध होणार आहे.
रब्बीनंतर उन्हाळ्यासाठी दुसरे आवर्तन
यापूर्वी ७ जानेवारी रोजी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ऊस, केळी, हळद आदी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानुसार आता दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
पाच कालव्यांद्वारे सिंचन
सिद्धेश्वर धरणातून पुढे पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासीना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा आणि अंतिम शाखा कालवा अशा पाच कालव्यांद्वारे पाणी शेतांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
या योजनेमुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील एकूण ५७ हजार ९८८ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतीबरोबरच २५० हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचाही लाभ मिळणार आहे.
जलविद्युत प्रकल्पाला चालना
धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे येलदरी येथे उभारण्यात आलेल्या जलविद्युत केंद्रालाही चालना मिळाली आहे. तीन संचांपैकी दोन संच सध्या कार्यरत असून, एकूण १५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाला काही प्रमाणात अतिरिक्त वीज उपलब्ध होणार आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाण्याची बचत करावी, तसेच नियोजनबद्ध पद्धतीने पाणी वापरावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
येलदरीतून सुरू झालेल्या या आवर्तनामुळे रब्बी व उन्हाळी पिकांना दिलासा मिळणार असून, सिंचन व वीज निर्मिती या दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
