विकास राऊत
मराठवाडा आता ढगफुटीचा प्रदेश होत चालला आहे. २०२० पासून आजपर्यंत विभागाला तीन वेळा ओला दुष्काळाचा सामना करावा लागला. पाच वर्षांत तब्बल ४२ तालुक्यांतील खरीप हंगाम ढगफुटीमुळे पूर्णपणे वाया गेला. (Monsoon Effect)
यंदाही १२ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २४ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांपैकी ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.(Monsoon Effect)
रात्रीतून पावसाचा कहर
मागील दहा दिवसांत झालेल्या पावसाचा पॅटर्न चिंताजनक आहे. दिवस चांगलाच उन्हाळा दाखवत असताना रात्रीतून अचानक ढगफुटीसारखा पाऊस कोसळतो. यामुळे जीवितहानी, जनावरांचे बळी आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या मते, यामागे बाष्पीभवन व 'डाऊनरफ्ट' ही मुख्य कारणे आहेत.
हिमालयाकडे तापमान वाढल्याने हवेतील आर्द्रता वाढते. दिवसा वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे ढग जमतात. रात्री अचानक डाऊनरफ्ट होऊन ढगफुटीसारखा पाऊस कोसळतो.- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ
अतिवृष्टीची आकडेवारी : १० दिवसांत ३९५ मंडळे प्रभावित
१२ ते २३ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागांत वारंवार ढगफुटीसारखी अतिवृष्टी झाली.
तारीख | अतिवृष्टी झालेली मंडळे |
---|---|
१३ सप्टेंबर | १९ |
१४ सप्टेंबर | ५३ |
१५ सप्टेंबर | ३२ |
१६ सप्टेंबर | ४१ |
१७ सप्टेंबर | १५ |
१८ सप्टेंबर | ५ |
१९ सप्टेंबर | ७ |
२० सप्टेंबर | १० |
२१ सप्टेंबर | ९ |
२२ सप्टेंबर | ७५ |
२३ सप्टेंबर | १२९ |
एकूण | ३९५ |
ही आकडेवारी दाखवते की फक्त दहा दिवसांत शेकडो मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
हवामान अंदाजयंत्रणा फसली का?
मराठवाड्यासाठी स्वतंत्र हवामान संशोधन आणि विश्लेषणाची गरज वारंवार अधोरेखित होत आहे. सरकारने हवामान अंदाजासाठी एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली; पण अद्याप ते वास्तवात आलेले नाही. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना मिळत नाही, आणि अचानक होणाऱ्या ढगफुटीमुळे शेतकरी हवालदिल होत आहेत.
बदललेला मान्सून पॅटर्न
हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे.
हिमालयाच्या भागात वाढलेले तापमान, हवेतील वाढलेली आर्द्रता आणि दिवसा होणारे बाष्पीभवन यामुळे ढगांची घनता वाढते.
रात्री अचानक होणारा डाऊनरफ्ट (थंड हवेचा झोत) ढगफुटीसारखा पाऊस कोसळण्यास कारणीभूत ठरतो.
मराठवाड्यातील शेतकरी सलग काही वर्षांपासून अतिवृष्टी आणि ढगफुटीचा फटका सोसत आहेत. पिके, जनावरे, घरे, संसार सगळे उद्ध्वस्त झाले आहे.
हवामान अंदाजयंत्रणा अद्यापही कागदावरच असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका अधिक बसतो. ढगफुटीमागची कारणे वैज्ञानिकांनी स्पष्ट केली असली तरी शेतकऱ्यांसाठी तातडीने धोरणात्मक उपाययोजना आणि भरीव मदत आवश्यक आहे.