- अजय पाटील
जळगाव : सध्या उन्हाने अक्षरशः कहर केला असून, गेल्या १५ दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पार आहे. ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारांनी हैराण असतानाच, आता आगामी मान्सूनबाबतही चिंताजनक वृत्त समोर येत आहे. जागतिक हवामानावर प्रभाव टाकणारा 'एल निनो' यंदा सक्रिय होत असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीतील या वाढत्या तापमानाचा संबंध यंदाच्या बदलत्या जागतिक हवामान स्थितीशी जोडला जात आहे. एल निनोचा प्रभाव संपूर्ण भारतासह जगावर होणार आहे, त्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यावर हा परिणाम दिसून येत असून, सद्यःस्थितीत प्रचंड उष्णतेने लोक त्रस्त आहेत. तर आता मान्सूनवर परिणाम होऊन, सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे 'एल निनो'चे संकट ?
यंदा जागतिक स्तरावर 'सुपर एल निनो'चे वर्ष राहण्याचे संकेत आहेत. जर हा एल निनो मे-जून महिन्यातच पूर्णपणे सक्रिय झाला, तर मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाची मोठी दडी पाहायला मिळू शकते. जर एल निनो जुलैनंतर सक्रिय झाला, तर जून-जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस होऊन दिलासा मिळू शकतो. मात्र, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या एकूण सरासरीत मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे.
काय म्हणतात हवामान तज्ज्ञ...
हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले की, 'एल निनो' मुळे मान्सूनवर परिणाम होत असतो. गेल्या काही दशकांमध्ये ही स्थिती दिसून आली आहे. एलनिनोच्या काळात पूर्णपणे पाऊस होतच नाही, असे राहत नाही. पाऊस होतो, मात्र त्याचे प्रमाण कमी असते. 'एलनिनो' केव्हा सक्रिय होईल, यावर सर्व अवलंबून राहणार आहे. जुलैनंतर एलनिनो सक्रिय झाल्यास सुरुवातीला चांगला पाऊस होऊ शकतो. मात्र, जागतिक हवामान अंदाजानुसार एलनिनो लवकर म्हणजेच मे-जून महिन्यात सक्रिय होऊ शकतो. एलनिनोचा काळ हा सहा ते सात महिन्यांपर्यंत राहतो.
धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीपुढील पेच
गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सध्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे, परिणामी अद्याप मोठी पाणीटंचाई जाणवलेली नाही. मात्र, आगामी मान्सूनमध्ये पाऊस कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम धरणांमधील पाणीसाठ्चावर आणि आगामी खरीप हंगामाच्या पेरण्यांवर होणार आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Gangapur Dam : नाशिकची सगळी मोठी धरणे 50 टक्क्यांच्या खाली आली, गंगापूर धरणात किती पाणी शिल्लक?
