Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : आज उकाडा, दोन दिवसांनी अवकाळी? हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:35 IST

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा कहर वाढत असून पुढील २४ तासांत उकाडा आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, १४ आणि १५ मार्चदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तीव्र मारा सुरू असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.(Maharashtra Weather Update)

राज्यात अचानक वाढलेल्या उकाड्यामागील कारण हवामान विभागाने स्पष्ट केले असून गुजरात व राजस्थान परिसरात तयार झालेल्या अँटी सायक्लॉनमुळे महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत असल्याने तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचे सांगितले आहे. पुढील २४ तासांतही राज्यातील उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)

गुजरात-राजस्थानमधील अँटी सायक्लॉनचा परिणाम

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि गुजरात परिसरात अँटी सायक्लॉन सक्रिय झाला आहे. या प्रणालीमुळे उत्तर-पश्चिमेकडून कोरडे आणि उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान झपाट्याने वाढले आहे.

विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात उष्णतेची तीव्रता जास्त जाणवत आहे. मंगळवारी मुंबईत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर ठाणे परिसरात तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले. दिवसासोबतच रात्रीचे तापमानही तुलनेने जास्त राहिल्याने नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

कोकणात उकाड्याचा कहर

पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई परिसरात कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सकाळी ११ नंतर सूर्याची तीव्रता वाढत असून दुपारी उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारी ११ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, हलक्या रंगाचे सूती कपडे परिधान करावेत, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देशातील अनेक राज्यांत हवामान बदल

देशातील अनेक भागांतही हवामानात बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाने बिहार, झारखंड आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तविली आहे.

उत्तरेकडील भागात पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्याने हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानात नव्याने बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

१४-१५ मार्चला विदर्भात अवकाळीचा इशारा

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १४ आणि १५ मार्चदरम्यान विदर्भात अवकाळी पावसाचे सावट राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यास त्याचा प्रभाव मध्य भारत आणि विदर्भावर पडू शकतो. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

अचानक उष्णता आणि संभाव्य अवकाळी पावसामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य काळजी घ्यावी, काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवावे, तसेच हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Weather Update : मराठवाड्यात तापमान वाढणार; 'या' तारखांना वादळी पावसाची शक्यता

अधिक वाचा : Wainganga Nalganga Project : विदर्भाची तहान भागणार! 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पाला अखेर मंजुरी; जलक्रांतीची नवी पहाट

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: State Braces for Changing Conditions; Updates Here

Web Summary : Maharashtra's weather is anticipated to shift. Stay informed about the developing weather patterns across the state. Expect potential fluctuations in temperature and precipitation. Keep checking for the latest updates and advisories regarding regional weather conditions to stay prepared.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकण