Maharashtra Rain : महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबरपर्यंत, वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहानपूर या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर मान्सून सप्ताहभर जागेवरच थबकण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता टिकून राहू शकते.
हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतर -
अपेक्षित असलेल्या कमी दाबाचे आज पहाटे तीव्र कमी दाबात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम जाणवते.
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार
हवेच्या तीव्र कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात मंगळवार दि. ३० सप्टेंबरपासुन २-३ दिवस पावसासाठी काहीशी उघडीप मिळू शकते असे वाटते.
पूरजन्य परिस्थितीची शक्यता
संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगांव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर अशा महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात, मंगळवार दि. ३० सप्टेंबरपर्यंतच्या ४ दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवत आहे. धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्येकडे सरकणार -
मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बं. उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता व त्याचे उत्तर व उत्तर मध्य भारताकडे होण्याच्या मार्गक्रमण शक्यतेतून महाराष्ट्रात दि. ८-९ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या धोका कमी जाणवतो, असे वाटते.
दसऱ्यानंतर उघडीपीची शक्यता-
शुक्रवार ३ ऑक्टोबरपासुन महाराष्ट्रात पूर्णतः नव्हे, परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते. मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही पावसाची शक्यता कायम जाणवते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.