Maharashtra Rain : संपूर्ण महाराष्ट्रात परवा दि. २६ ऑगस्ट मंगळवार ते शुक्रवार दि. २९ ऑगस्टच्या चार दिवसा दरम्यान, मान्सून काहीसाच सक्रिय होवून, मध्यम पावसाची शक्यता जाणवते. हा संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या व शेवटच्या स्पेलचा 'मघा' नक्षत्रातील पाऊस आहे.
विशेषतः हा पाऊस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीसह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात, तसेच सह्याद्रीच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक जाणवते.
त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या व कॅनॉल पात्रात अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पुर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असे वाटते.
कोणत्या वातावरणीय प्रणाल्यातून ह्या पावसाची शक्यता जाणवते ?
- i) बं. उपसागरात, सोमवार दि. २५ ऑगस्ट दरम्यान होणारा एम.जे.ओ. चा प्रवेश
- ii) ईशान्य मध्य प्रदेशावर समुद्रसपाटीपासुन ७.६ किमी उंचीपर्यन्त तयार होणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि वायव्य दिशेकडे होणारे त्याच्या मार्गक्रमणाची शक्यता
- iii) देश मध्यावरचा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यतेचा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम मान्सूनचा आस
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune