Jayakwadi Dam water Update : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागात म्हणजेच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. (Jayakwadi Dam water Update)
परिणामी, जायकवाडी धरणात जुलै महिन्यातच पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आणि धरण तब्बल ९३ टक्क्यांपर्यंत भरले. त्यानंतरपासून धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात आणि कालव्यांमार्फत सोडले जात आहे. (Jayakwadi Dam water Update)
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, धरणातील जिवंत पाणी साठा ७६ टीएमसी आहे आणि प्रकल्पाचे दरवाजे सतत उघडण्यात येत आहेत. (Jayakwadi Dam water Update)
रविवारीही प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. आतापर्यंत ५७.५ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात आल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.(Jayakwadi Dam water Update)
जायकवाडी प्रकल्पाची आकडेवारी
एकूण साठवण क्षमता: १०२ टीएमसी
जिवंत पाणी साठा: ७६ टीएमसी
सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट: १,८८,००० हेक्टर
प्रत्यक्षात सिंचनाखाली आलेले क्षेत्र: १,४०,००० हेक्टर
जुलै महिन्यात धरणाची भरलेली टक्केवारी: ९३%
आतापर्यंत सोडलेले पाणी: ५७.५ टीएमसी
पाण्याचा वापर सिंचनासाठी
उर्ध्वभागातील सततच्या पावसामुळे जुलैपासून धरणात मोठी आवक होत राहिली. सुरुवातीला उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पासाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. नंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी देण्यात आले.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत पाऊस होत राहिल्यामुळे जायकवाडीचे दरवाजे वेळोवेळी उघडावे लागले. सध्या दोन गेट्समधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे आणि जायकवाडीतील जलसाठ्यामुळे पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, धरणातील निम्म्यापेक्षा अधिक पाणी सोडल्याने पुढील काळात जलसाठा किती शिल्लक राहतो, यावर रब्बी हंगामातील सिंचन व्यवस्थापन अवलंबून असेल.
जुलैपासून आजपर्यंत जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात आणि डाव्या व उजव्या कालव्याद्वारे ५७.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. यातील अडीच टीएमसी पाणी माजलगाव प्रकल्पासाठी देण्यात आले. सध्या दोन दरवाजांतून विसर्ग सुरू आहे.- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी