Jayakwadi Dam Water Discharge : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण पाण्याने टच्च भरून वाहू लागले आहे. सध्या या धरणात तब्बल १८ दशलक्ष घनफुट (दलघमी) पाण्याचा साठा झाला असून, धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Jayakwadi Dam Water Discharge)
धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीहून अधिक जलसाठा झाल्याने मराठवाड्यातील पाणीस्थिती सुखावह झाली आहे. धरणाचे तब्बल १८ दरवाजे प्रत्येकी एक फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात १८ हजार ८६४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Water Discharge)
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
एकूण जिवंत साठा : २८६७.२४७ दलघमी
आतापर्यंत आवक (जूनपासून) : ६९.८०१७ टीएमसी
विसर्ग (गोदापात्रात सोडलेले पाणी) : १०.८२५७ टीएमसी
सध्याची पाण्याची पातळी : १५२१.६५ फूट
जलसाठा टक्केवारी : ९८.०७ टक्के
दरवाज्यांच्या उघडझापीचा आढावा
शनिवारी धरणातील आवक कमी झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रातील विसर्ग कमी केला होता. त्यामुळे १८ पैकी १० दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, सोमवारी पुन्हा आवक वाढल्याने मंगळवारी सकाळी सर्व १८ दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले.
आवक वाढली, विसर्गही वाढला
सततच्या पावसामुळे वरच्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत असून धरण प्रशासनाला विसर्ग सुरू ठेवावा लागत आहे.
नागरिकांना सूचना
गोदावरी नदीकाठावरील गावांनी दक्षता घ्यावी, नदीपात्राजवळ अनावश्यक वावर टाळावा, अशी सूचना शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.
शेतीला दिलासा
जायकवाडी धरणातील जलसाठा जवळपास पूर्ण क्षमतेला पोहोचल्याने मराठवाड्यातील शेती, पाणीपुरवठा आणि उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप पिकांना याचा थेट फायदा होणार असून पाणीटंचाईची भीती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.